अमरावती – अजित पवार यांनी 2 जुलै रोजी शिंदे -फडणवीस यांच्या सोबत हातमिळवणी करत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. त्यानंतर आता मंत्रीमंडळ विस्ताराबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिल्लीला रवाना झाले होते. भाजपच्या वरीष्ठ नेत्यांसोबत काल त्यांची खाते वाटपावर चर्चा झाली. गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने बैठकांचे सत्र सुरु होते. मात्र खातेवाटपावर मार्ग निघत नसल्याने काही नेते मंडळी नाराज आहेत. यातच आता मंत्रीमंडळ विस्तारावर नाराज असणारे बच्चू कडू आज 11 वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ““मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मला फोन आलेला आहे. ११ वाजता मंत्रीमंडळात सामील होणार, नाही होणार वगैरे याबाबत माझी भूमिका मी जाहीर करणार आहे. त्यांनी मला फक्त फोन करून बोलवलं आहे. विस्ताराबाबत काय निर्णय घ्यायचा, याबाबत11 वाजता मी भूमिका जाहीर करणार आहे. मंत्रीमंडळ विस्तार का रखडला हे मला माहिती नाही. ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. पण आता या पुढे कशासाठी राजकारण करायचं? कुणासाठी काम केलं पाहिजे? पुढील वाटचाल कशी केली पाहिजे? यासंदर्भात मी बोलणार आहे.”
बच्चू कडू सध्या अमरावतीत असून त्यांच्या मतदारसंघातील कुरळपूर्ण येथे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर आपण कशासाठी राजकारण करायचं. कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे याबाबतची भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्यात येणार नसल्याने ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. त्याबाबत ते आज नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
आज मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. दिल्लीतील या बैठकीनंतर आज उर्वरित मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. आज शपथविधी कार्यक्रम होईल, असं बोललं जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस काही खात्यांसाठी आग्रही आहे. पण शिवसेनेच्या आमदारांचा त्याला विरोध आहे. अजित पवार यांना अर्थखाते हवे आहे. त्यासाठी ते आग्रही आहेत. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अजित पवार यांना अर्थखाते असताना त्यांच्याकडून निधी वाटपात भेदभाव केला गेला होता, असा आरोप शिवसेना आमदारांचा आहे. त्यामुळे याबाबतचा तिढा निर्माण झाला आहे.