औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काळा पैसा भारतात आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार असे म्हंटले होते. मात्र हे पैसे नागरिकांना मिळालेच नाही. पण औरंगाबाद येथील एका शेतकऱ्याच्या जनधन खात्यावर 15 लाख रुपये जमा झाले. यानंतर शेतकऱ्याने पंतप्रधान कार्यालयाला पैसे मिळाल्याचा मेल पाठवून आभार व्यक्त केले. शिवाय या शेतकऱ्याने मिळालेल्या पैशातून 9 लाख रुपयाचे घरही बांधले. शेतकरी ज्ञानेश्वर औटे (दावरवाडी, तालुका पैठण) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
शेतकरी ज्ञानेश्वर औटे यांच्या जनधन खात्यावर काही महिन्याआधी 15 लाख जमा झाले. ज्ञानेश्वर यांनी काही महिने वाट पाहिली तरी खात्यातून पैसे वळते झाले नाही किंवा कुणी तशी विचारणा सुद्धा केली नाही, म्हणून त्यांनी खात्यातून पैसे काढून घर बांधले. मात्र काही दिवसांनी एक वेगळाच गोंधळ समोर आला आणि बँक प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन या शेतकऱ्यांसमोर हात जोडून विनंती करीत आहे. पैसे चुकून जनधन खात्यावर जमा झालेत ते परत करा, अशी मागणी बॅंक आणि जिल्हा प्रशासन करत आहे.
बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांना नंतर लक्षात आले की, ग्रामपंचायत पिंपळवाडी ग्राम पंचायतीच्या खात्यात हे पैसे जमा करायचे होते तेच पैसे चुकून ज्ञानेश्वर यांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर यांच्या खात्यात उरलेली रक्कम बँकेने वळती करून घेतली. आता बँक ज्ञानेश्वर यांच्याकडे पैसे बँकेला परत करण्याची विनंती करीत आहे.