– डॉ. दत्तात्रय शेकटकर
राष्ट्रीय तपास यंत्रणेने अलीकडेच देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून आणि काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईतून देशातील राष्ट्रद्रोही तत्त्वांचे घातक मनसुबे समोर आले आहेत. विघातक तत्त्वे हे एक आव्हानच आहे.
राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने अलीकडेच इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या आरोपांवरून पुन्हा एकदा संपूर्ण देशभरामध्ये मोठी कारवाई केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पुण्याचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वीही एनआयएने पुण्यामध्ये धाडी टाकून इसिसच्या मोड्युलनुसार देशात मूलतत्त्ववादी विचारसरणीचा प्रसार करून दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत असणार्या काही जणांना अटक केली होती. देशविघातक तत्त्वे संपूर्ण भारतात पसरलेली आहेत. त्यांचे संबंध पाकिस्तानसह मध्य पूर्वेतील काही देशांशी जोडलेले आहेत. त्यांचा पैसा प्रामुख्याने पाकिस्तानातून येतो. सलग तीन युद्धांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तान आपल्याशी प्रत्यक्ष युद्ध करत नसून त्यांनी अघोषित युद्ध किंवा छद्मयुद्धाचा मार्ग अवलंबला आहे. या युद्धासाठी पाकिस्तानचे सैन्य वापरले जात नाहीये. त्याऐवजी पाकिस्तानशी संबंधित असणार्या भारतातील लोकांचा वापर केला जात आहे. विशेषतः महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार आणि केरळ या राज्यातील अनेकांचा वापर यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अभ्यास केल्यास त्याचे धागेदोरे पाकिस्तानात होते; परंतु ते कृत्य करण्यामध्ये मदत करणारे लोक हे भारतातीलच होते.
त्यापूर्वी मुंबईची जीवनरेखा असणार्या लोकल रेल्वेमध्ये साखळी बॉम्बस्ङ्गोट झाले होते. त्या स्ङ्गोटांसाठी भलेही आर्थिक रसद पाकिस्तानातून पुरवली गेली असेल; परंतु प्रत्यक्षात बॉम्ब पेरणारे लोक पाकिस्तानचे नव्हते. ते दुष्कृत्य भारतातील लोकांनीच केले. बॉम्बस्ङ्गोट घडवून आणण्यासाठी लागणारी सामग्री बाजारात मिळत असली तरी तो बॉम्ब बनवण्यासाठीची माहिती त्यातील तज्ज्ञाकडूनच मिळते. अशा प्रकारची माहिती देणार्यांची संख्याही भारतात मोठी आहे. राष्ट्रद्रोही तत्त्वांना मदत करण्याची मानसिकता आपल्याकडे अनेक वर्षांपासून आहे. ही मानसिकता जोपर्यंत दूर होत नाही, तोवर आतंकवाद संपवण्यामध्ये आपल्याला यश येणार नाही.
आतंकवादी हा आईच्या पोटातून जन्म घेतल्यापासून बंदुक चालवायला शिकत नाही की राष्ट्रविद्रोही म्हणून जन्म घेत नाही. दहशतवादी हे तयार केले जातात, घडवले जातात, प्रशिक्षण देऊन विकसित केले जातात. असे काम करणारे हे अधिक घातक असतात. दुर्दैवाने, विशिष्ट भागांमध्ये अशा मानसिकतेचे लोक आढळत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
आणखी एक गोष्ट म्हणजे, भारतविरोधी कारवाया करण्यासाठी भलेही पाकिस्तानसारखी राष्ट्रे अर्थसाहाय्य करत असली तरी पाकिस्तानची करन्सी आपल्याकडे चालत नाही. त्यासाठी भारतीय रुपयाचाच वापर केला जातो. हा पैसा यांना कोण देतो? हे ङ्गायनान्सर हवालाचे काम करणारे, काळ्या पैशांची कमाई करणारेच असतात. अशा लोकांची संख्या मोठी असल्याचे दिसून येत आहे. एनआयएला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही सर्व छापेमारी सुरू आहे. त्यांना मिळालेली माहिती जवळपास 80 टक्के खरी असते. त्यामुळे त्यांना या विघातक व्यक्तींची धरपकड करण्यास मदत होते आणि त्यांच्या तपासातून धक्कादायक बाबी उघड होत जातात. मुळाशी जाऊन विचार केल्यास, अशा प्रकारची राष्ट्रविरोधी तत्त्वे किंवा मानसिकता भारतात हजारो वर्षांपासून आहे. राष्ट्रद्रोही मानसिकता जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे देशद्रोही तयार होतच राहणार.
अमेरिकेने 2001 पासून आतापर्यंत 13 लाखांहून अधिक लोक दहशतावादाविरुद्धच्या लढाईत मारले; पण दहशतवाद संपला नाही. पाकिस्तानमध्ये जर्ब ए अज्ब या मोहिमेअंतर्गत उत्तर वझिरीस्तानातील ङ्गताह या भागात दहशतवादविरोधी मोहीम सुरू करण्यात आली. पण तरीही दहशतवाद कमी झाला नाही. उलट वाढतच गेला. त्या दहशतवाद्यांनी या अधिकार्यांच्या मुलांना शाळेत जाऊन मारले. त्यामुळे माणसे मारण्याने दहशतवाद संपणार नाही. दहशतवाद संपवण्यासाठी वृत्ती, मानसिकता मारावी लागेल. त्या वृत्तीला खतपाणी घालणार्यांचा बंदोबस्त करावा लागेल. दहशतवादाचे आश्रयदाते, आर्थिक दाते संपवावे लागतील. 1996 मध्ये मी तिथे असताना आम्ही दहशतवादी वृत्तीला लगाम घातला होता. तेथील लोकांना त्यांच्या भविष्याविषयीची जाणीव करून देऊनच हे यश मिळवले होते.
त्यामुळे दहशतवाद, नक्षलवाद, उग्रवाद यांच्याविरोधातील युद्ध लोकसहभागातूनच जिंकता येईल. या प्रश्नाचा सखोल विचार होणे आवश्यक आहे. यासाठी शालेय शिक्षणाच्या पातळीपासून आपल्याला दक्ष राहावे लागेल. सुशिक्षित तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील. त्यांचे प्रबोधन करावे लागेल. चुकीच्या मार्गावर गेल्यावर परतीचे मार्ग बंद होतात याची जाणीव त्यांना करून द्यावी लागेल. त्यांच्या आई-वडिलांनाही हा संदेश दिला गेला पाहिजे.
याखेरीज सर्वसामान्य नागरिकांची सजगताही तितकीच महत्त्वाची आहे. आपल्या जवळपास घडणार्या घटनांबाबत ‘आपल्याला काय करायचंय’ अशा प्रकारची मानसिकता भारतात सर्रास दिसून येते. परंतु आपण हा विचार केला पाहिजे की शेजारच्या घरात लागलेली आग आपल्या घरापर्यंतही पोहोचू शकते. त्यामुळे समाजाला ही मानसिकता बदलावी लागेल. आपल्या सोसायट्यांमध्ये राहणारे लोक कोण आहेत, कुठून आले आहेत याकडे एक सजग नागरिक म्हणून आपले लक्ष असलेच पाहिजे. एखाद्या फ्लॅटमध्ये, घरामध्ये काही अनोळखी, संशयास्पद दिसणार्या व्यक्ती येत असतील तर त्याबाबत आपल्याला शंका आली पाहिजे आणि ती माहिती पोलिसांना दिली पाहिजे. जोपर्यंत लोक शासकीय सुरक्षा पद्धतीला मदत करणार नाहीत तोपर्यंत सुरक्षाव्यवस्था मजबूत होणार नाही. काश्मीर, पंजाब, ईशान्य भारतामध्ये काम करताना आम्ही आतंकवाद्यांना पकडण्यासाठी तेथील स्थानिकांचीच मदत घेत होतो. त्या-त्या भागातील लोकांशी संवाद साधून या समस्येवर मात करता येऊ शकते