Buldhana Bus Accident : नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला बुलढाणा येथील पिंपळखुटा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या अपघातात 26 जण ठार झाले आहेत. या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नुकतेच ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अपघातावरून शिंदे सरकारला चांगलेच सुनावले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी अपघातामध्ये मरण पावले आहेत. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे.”
याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.त्यांनी ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की,’अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना. या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते.’ असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.