गुवाहाटी – आसामातील कॉंग्रेसचे आमदार शेरमन अली अहमद यांच्यावर आज जातीयद्वेष भावना पसरवल्याच्या कारणावरून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना आज दिसपूर येथील आमदार निवासातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात देशद्रोहाचेच कलम लावण्यात आले आहे.
त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि भाजप युवामोर्चा यांच्यावतीने अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान कॉंग्रेसनेही त्यांच्यावर जातीयद्वेष भावना पसरवल्याच्या कारणावरून नोटीस जारी केली आहे. त्यांना तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या वक्तव्याचा कॉंग्रेसने या आधीच निषेध केला आहे.
1983 च्या आसाम दंगलीच्या काळात दर्रांग जिल्ह्याच्या सिपाझर भागातील घुसखोरांनी आठ जणांना ठार मारल्याचा आरोप भाजपने केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शेरमन अली अहमद यांनी म्हटले होते की,जे आठ जण ठार झाले होते ते हुतात्मा नव्हते तर मुस्लिमांचे हत्यारे होते.
त्यांच्यावर तेथील स्थानिक मुस्लिमांनी स्वसंरक्षणाच्या कारणासाठी हल्ला केला होता. त्यात ते मारले गेले होते, असे विधान त्यांनी केले होते. आसाम आंदोलनाच्या काळातील जुन्या जखमांवरील खपली काढण्याचा प्रयत्न आमदार अलि अहमद यांनी केला आहे तो निषेधार्ह आहे, असे कॉंग्रेसनेही म्हटले असून त्यांचे हे वक्तव्य अनाठायी आणि अनावश्यक होते, असेही कॉंग्रेसने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.