हांगझोऊ :- भारतीय क्रीडापटूंनी येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी आगेकूच कायम राखली आहे. भारताच्या नेमबाज व रोइंगपटूंनी पदके मिळवत सातत्यही कायम राखले आहे.
या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तब्बल पाच पदके मिळवलेल्या भारतीय खेळाडूंनी यानंतर सातत्याने सरस कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या दिवशी सहा पदकांची कमाई केली. त्यातच सुवर्णपदकाचेही खाते उघडले होते. त्यातच महिला क्रिकेट संघानेही सुवर्णपदकावर नाव कोरल्यावर देशाच्या पदक संख्येत वाढही झाली.
नेमबाजीत आदर्श सिंग, विजयवीर सिंग व अनिश भानवाला यांनी पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात ब्रॉंझपदक मिळवले. भारताच्या तीन नेमबाजांनी सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले. त्यांची वैयक्तिक गटात पदक मिळवण्याची संधी मात्र हुकली.
भारतीय नेमबाजांना ब्रॉंझपदकासाठी इंडोनेशियाविरुद्ध टायब्रेकरमध्ये लढत द्यावी लागली. दोन्ही देशांचे गुण 1718 असे समान झाल्यामुळे ही लढत टायब्रेकरमध्ये गेली व त्यात भारतीय संघाला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. आदर्श सिंग, अनिश भानवाला, विजयवीर सिंग यांनी देशासाठी ब्रॉंझपदक मिळवून दिले.
नौकानयनात नेहाला रजतपदक
मध्य प्रदेशमधून नावारूपाला आलेल्या अवघ्या 17 वर्षांच्या नेहा ठाकूरने नौकानयन स्पर्धेत देशाला रजतपदकाची कमाई करून दिली. हे भारताचे स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीचे पहिले पदक ठरले.
नेहाने आयएलसीए 4 या नैकानयन गटात आपले वर्चस्व राखले. तिचा अनुभव कमी पडल्याने तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नेहाने देशासाठी इतक्या मोठ्या स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच रजतपदकाचा मान मिळवला. यापूर्वी तिने याच वर्षी आशियाई सेलिंग स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवले होते.