नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने महिलांची सुरक्षा जपण्यासाठी ऑपरेशन महिला सुरक्षा मोहीम दिनांक 3 ते 31 मे 2022 दरम्यान संपूर्ण भारतात राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान “आरपीएफ’ने महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या 7 हजारांहून अधिक व्यक्तींना अटक केली आहे. “आरपीएफ’ने 150 मुली आणि महिलांना मानवी तस्करीचे बळी होण्यापासून वाचवले आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासासाठी अधिक संरक्षण देण्याच्या उद्देशाने मेरी सहेली हा उपक्रम संपूर्ण भारतभर कार्यरत आहे. 283 प्रशिक्षित महिला अधिकारी आणि कर्मचारी असलेल्या या चमूने विविध ठिकाणी दररोज सरासरी एकूण 1125 महिला “आरपीएफ’ कर्मचारी तैनात केले आहेत, त्यांनी या कालावधीत 2 लाख 25 हजारांहून अधिक महिलांशी संवाद साधला, या काळात पुरुष आणि महिला “आरपीएफ’ कर्मचाऱ्यांच्या मिश्र तुकड्या असलेले ट्रेन एस्कॉर्ट देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले होते.
रेल्वे प्रवास करणाऱ्यांना त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांच्या सुरक्षिततेसाठी काय करावे आणि काय टाळावे,याबद्दल शिक्षित करण्यासाठी, 5742 जागरुकता मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या. या महिनाभर चाललेल्या कार्यवाहीमध्ये, आरपीएफ जवानांनी चालत्या ट्रेनमध्ये चढताना, उतरताना घसरलेल्या आणि चालत्या ट्रेनखाली येण्याची शक्यता असलेल्या 10 महिलांचे प्राण वाचवले आहेत.