पुणे – महाबळेश्वर- पाचगणी या पर्यावरणदृष्टया अतिसंवेदनशील क्षेत्रातील ध्वनी प्रदूषण आणि वाहतूक नियमन व नियंत्रण करण्यासह इतर अनुषंगिक कार्ये पार पाडण्याकरीता केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार राज्य शासनाने 10 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्य शासनाच्या नगररचना विभागाचे माजी संचालक सुधाकर नांगनुरे यांची नियुक्ती केली आहे.
महाबळेश्वर पाचगणी प्रदेश संरक्षित व संवर्धित राहण्याच्या दृष्टीने पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 चे तरतुदी अंतर्गत “पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभाग” म्हणून घोषित करण्यात आला आहे. या अधिसूचनेअंतर्गत नमूद असलेल्या तरतुदीचे अनुपालन होत असल्याचे सुनिश्चित करणे व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रतील ध्वनी प्रदूषण , वाहतूक नियमन व नियंत्रण करणे इत्यादी अनुषंगिक कार्ये पार पाडण्याकरता केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार संनियंत्रण समिती पुनर्गठित करणे आवश्यक होते.
त्यानुसार ही समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी नांगनुरे असणार आहे. तर समितीच्या सदस्यांमध्ये महाबळेश्वरचे मुख्य वनसंरक्षक, नगर विकास विभागाचे सहसचिव, साताऱ्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहसंचालक नगर रचना पुणे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, नगरपालिका प्रशासनाचे प्रादेशिक उपसंचालक यांच्यासह पर्यावरण तज्ञ डॉ.अंकुर पटवर्धन, डॉ.पूर्वा केसकर यांचा समावेश आहे. या समितीचा कार्यकाल तीन वर्षांचा असणार आहे. याबाबतचे आदेश नगर विकास विभागाच्या सह सचिव डॉ. प्रतिभा भदाने यांनी जारी केले आहेत.
चौकट
सुधाकर नांगनुरे हे राज्याच्या नगररचना विभागाचे निवृत्त संचालक असून त्यांनी यापूर्वी मंत्रालयात नगर विकास विभागाचे उपसचिव म्हणून काम पाहिले आहे. असेच नोंदणी व मुद्रांक विभागात नगररचना सहसंचालक (मूल्यांकन) या पदावर सुध्दा काम केले आहे. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभाग म्हणून घोषित केलेल्या माथेरान व डहाणू या प्रदेशाच्या सनियंत्रण समितीवर सदस्य व सदस्य सचिव म्हणून काम केले आहे. नगर विकास विभागातील अभ्यासू व तज्ञ म्हणून नांगनुरे यांची ओळख आहे.