तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि शिस्तबध्द पद्धतीने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित भारताच्या उभारणीत योगदान द्यावे, असे प्रतिपादन ,केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. बाराव्या रोजगार मेळाव्याचे आयोजन तळेगाव दाभाडे येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात १९१ जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.
तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि. १२) आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्रावर आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या रोजगार मेळाव्यात १९१ जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, सीआरपीएफ पुणे रेंज पोलीस उपमहानिरीक्षक डी. एल. गोला, पोलीस उपमहानिरीक्षक ग्रुप केंद्र पुणे राकेशकुमार चौधरी, लाभार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि शिस्तबध्द पद्धतीने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित भारताच्या उभारणीत योगदान द्यावे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील बेरोजगार तरुणांना हक्काची नोकरी दिल्यामुळे आज देशभरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. तसेच इतर विविध योजनाच्या माध्यमातूनही मध्यमवर्गीय कुटुंबाना दिलासा दिला असुन आज देशाची प्रगती यशोशिखरावर पोहचली आहे.
आज नियुक्ती पत्र मिळालेल्या उमेदवारांना सीमा सुरक्षा दल, सीमा रस्ते संघटना, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी विभाग, रेल्वे, आदिवासी विकास विभाग आणि भारतीय अन्न महामंडळ आदी विविध सरकारी विभागांमधून काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नोकरीचे नियुक्ती पत्र मिळाल्याने सर्वत्र आंनदी वातावरण निर्माण झाले होते.