नवी मुंबई : राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासकीय यंत्रणा दिवस-रात्र झटत आहे. पण या संकटात काही अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन जबाबदारीतून पळ काढू पाहत असल्याचे चित्र नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दिसून येत आहे. एपीएमसी मार्केटमधील तब्बल 20 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अन्य कोणत्याही कामांना प्राधान्य न देता सर्वत्र करोनावर लक्ष केंद्रित केले जात आहे. एपीएमसीमध्येही करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसीतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. पण करोनाच्या भीतीमुळे जवळपास 20 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये अधीक्षक अभियंता विलास विरादार, सह सचिव अविनाश देशपांडे यांच्यासह सुरक्षा विभाग, अभियंता विभाग, प्रशासन, भाजीपला मार्केट, फळ मार्केट भागातील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे.
याबाबत एपीएमसी मार्केटचे प्रशासक आणि सचिव अनिल चव्हाण म्हणाले, एपीएमसीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर काम सुरू आहे. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी जे अर्ज केले आहे त्यावर आता कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही, असे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे निवृत्तीसाठी ज्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अर्ज दिले आहेत. त्यापैकी काही अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारच्या तक्रारी आहेत. या चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी त्यांनी निवृत्ती घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न चालवल्याची चर्चा एपीएमसीमध्ये सुरु आहे. परंतु त्यांना स्वेच्छानिवृत्ती मिळाल्यास मागील काही महिन्यांत एपीएमसीमध्ये घडलेले अनेक घोटाळे दडपले जातील, असेही म्हटले जात आहे.