अंकिता हर्षवर्धन पाटील यांचे आवाहन
बावडा- चार महिन्यांपासून राज्यात शासनाच्या परिपत्रकानुसार सर्वच सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्यानुसारच शनिवारी (दि.1) बकरी ईद साजरी करताना शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांत आपण सर्वधर्मिय सण साधेपणाने साजरे करीत आहोत. शनिवारी येणारी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी. ईदनिमित्त नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये, नमाजही घरीच अदा करावी, असे त्यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांसमवेत अंकिता पाटील यांनी संवाद साधून चर्चा केली. यावेळी माजी सरपंच समीर मुलाणी, चांद सय्यद, अफसर मुलाणी, रमजान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.