Brijendra Singh| माजी केंद्रीय मंत्री बिरेंदर सिंह यांनी भाजपला रामराम ठोकला. सोमवारी बीरेंद्र सिंह यांनी भाजपचा राजीनामा दिला. आता ते ऐन लोकसभा निवडणूक काळात कॉंग्रेसमध्ये वापसी करण्यास सज्ज झाले आहेत. बिरेंदर यांनी माजी आमदार असणाऱ्या पत्नी समवेत भाजप सोडत असल्याचे जाहीर केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ब्रिजेंद्र सिंह भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते.
त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि माझा राजीनामा पक्षप्रमुख जेपी नड्डा यांच्याकडे पाठवला आहे. 2014-2019 मध्ये आमदार असलेल्या माझी पत्नी प्रेम लता यांनीही पक्ष सोडला आहे. आज (मंगळवारी) आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहोत.
त्या दाम्पत्याचे पुत्र ब्रिजेंद्र यांनी मागील महिन्यात कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून बिरेंदर आणि त्यांच्या पत्नीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्याकडे हरियाणातील प्रभावी राजकीय दाम्पत्य म्हणून पाहिले जाते. तब्बल ४ दशके बिरेंदर कॉंग्रेसमध्ये होते. मात्र, त्या पक्षाचा हात सोडून ते २०१४ यावर्षी भाजपवासी बनले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात ते केंद्रीय मंत्री बनले. शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी मोदी सरकारविरोधात आंदोलन केले. त्यावेळी बिरेंदर यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. तेव्हापासून ते भाजपपासून दुरावल्याचे मानले गेले. आता लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त साधून ते भाजपमधून बाहेर पडले आहेत. चालू वर्षीच्या अखेरीस हरियाणात विधानसभा निवडणूक होईल. त्यामुळे बिरेंदर यांची घरवापसी कॉंग्रेसचा उत्साह वाढवणारी आहे.