पुणे -राज्याची भौगोलिक परिस्थिती पाहता राज्यात किमान अडीच लाख मधमाशांच्या पेट्या वसाहती राहतील आणि यातून लाखो टन मध निर्मिती होऊ शकेल, असे अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्या दरवर्षी दीड लाख किलो मध उत्पादन होत आहे.
राज्याला पश्चिम घाटाचे सह्याद्री पर्वताचे मोठे क्षेत्र लाभले आहे. जवळपास 12 जिल्हे आणि 63 तालुक्यांचा समावेश यामध्ये होतो. पर्यावरण जंगल आणि मधमाशांना उपयुक्त असणारा फुलोरा पश्चिम घाटात मुबलक मिळतो. या भागात कोल्हापूरमधील पाटगाव आजरा, भुदरगड, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई या तालुक्यांत आजही अनेक लोक मधमाशा पालन व्यवसायावर अवलंबून आहेत. दुग्धउत्पादन, मधमाशापालन, कुकुट्टपालन, वराहपालन, रेशिम उद्योग, इ अनेक उद्योग शेतीपूरक आहेतच; मात्र ते मुख्य उद्योग म्हणून करण्यासाठी शेतकऱ्यांनी तसेच बेरोजगारांनी तयारी दर्शवली पाहिजे. या सगळ्यांत मधमाशापालन हा भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर उद्योग ठरू शकतो. आरोग्याच्या बाबतीत संवेदनशील झालेले लोक मधाचे सेवन करणार आहेत. मधाचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे.
मधमाशांमुळे निसर्गाचा समतोल
मधमाशा केवळ मध व मेण एवढेच उत्पादन देत नाहीत, तर शेतपिकांचे 35 ते 40 टक्के उत्पादनदेखील वाढवितात. जगात मधाला प्रचंड मागणी असल्याने निर्यातीलाही मोठा वाव आहे. मधमाशांमुळे निसर्गाचा समतोल राखला जातो. मधमाशा पालनासाठी राज्य शासन 50 टक्के अनुदान देताना प्रशिक्षणही मोफत आणि मध खरेदीची हमीही देत आहे. केंद्र शासनाने या उद्योगास हातभार लावला आहे.
“मधाचे गाव’ची वर्षपूर्ती
महाबळेश्वर येथील मांघर या मधाच्या गावाच्या शुभारंभास वर्ष पूर्ण झाले. या काळात मधमाशा पाहण्यासाठी आणि शुद्ध मध घेण्यासाठी जवळपास लाखभर लोकांनी गावाला भेट दिली. यामुळे बचत गटांना रोजगार मिळाला आहे. मधमाशी पर्यटनही वाढले. गावातील शेती सेंद्रिय झाली आहे. गावाचे आर्थिक उत्पन्न वाढून अनेकांनी कायमचा रोजगार मिळवला आहे.
“मधाचे गाव’ संकल्पना खादी व ग्रामोद्योग मंडळ राबवित आहे. राज्यातील डोंगराळ व जंगली भागातील गावांची निवड “मधाचे गाव’ म्हणून करण्यात येत आहे. मधू पर्यटन आणि मधमाशी संवर्धन हे उद्देश ठेऊन सुरू झालेली ही लोकचळवळ अनेक गावांत पोहचली आहे. “मधाचे गाव’ संकल्पनेला शासनानेही बळ दिले आहे.
– बिपीन जगताप,उप मुख्य कार्यकारी अधिकारी (मध उद्योग) खादी व ग्रामोद्योग
मधमाशापालन हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा उद्योग आहे. भविष्यात मधाची वाढती मागणी आणि शेती पीक उत्पादनात होणारी मोठी वाढ पाहता, या उद्योगात मोठे आर्थिक उत्पन्न मिळवण्याची आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीस वाव आहे. दरवर्षी दि. 20 मे हा जागतिक मधमाशा दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त “प्रभात’च्या वाचकांसाठी ही माहिती.