मुंबई – देशात आणि परदेशात महागाईने धुमाकूळ घातल्यामुळे व्याजदरात वाढ होत आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर अनेक देशात तणाव निर्माण झाल्यामुळे शेअर बाजारात अस्थिरता धुमाकूळ घालत असतानाच काही विश्लेषकांनी दिवाळीच्या सुमारास शेअर बाजारात तेजी येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये शेअर बाजार निर्देशांक वाढतील आणि निफ्टी 18,200 ची पातळी गाठेल असे आयआयएफएल सिक्युरिटीज या संस्थेचे संचालक संजीव भसिन यांना वाटते. वर्तमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, भारताबाबत देशात आणि परदेशात नकारात्मक बोलले जात असताना शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या कमी पातळीवर आहेत.
आता हे निर्देशांक यापेक्षा जास्त कमी होणार नाहीत असे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यांनी 13 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात खरेदी करून निर्देशांकांना आधार दिला. भारतीय अर्थव्यवस्था उत्तम आहे. त्याचबरोबर भारतीय शेअर बाजारांचे भविष्य चांगले आहे. भारतीय शेअर बाजारावर किरकोळ गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असल्यामुळे अनेकदा संस्थागत गुंतवणूकदार नकारात्मक भूमिका घेत असतानाही शेअर बाजार निर्देशांक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मी काही खेड्यात गेलो होतो तेव्हा तेथे लोक दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणुकीची भाषा करीत होते. जागतिक बाजारात करेक्शन झाले तर काही प्रमाणात भारतातही करेक्शन होऊ शकते. मात्र जगातील इतर देशात पुन्हा तेजी येण्याअगोदर भारतात तेजी येणे निश्चित आहे असे ते म्हणाले.
कोणत्या कंपनीच्या शेअरच्या भावात जास्त वाढ होईल असे विचारले असता ते म्हणाले की अशा प्रश्नांची उत्तरे देणे अवघडत असते. मात्र सध्याच्या परिस्थितीत जेपी असोसिएट्स व बी एल कश्यप ऍण्ड सन्स कंपनीचे शेअरचे भाव वाढतील असे आपल्याला वाटते.
जेपी असोसिएट्स या कंपनीवर 28 हजार कोटी रुपयांचे कर्ज असले तरी या कंपनीकडे 9,000 कोटी रुपयांची लॅंड बॅंक आहे. त्याचबरोबर 750 कोटी रुपये राखीव आहेत. त्यामुळे सध्या 11 रुपये असलेल्या या कंपनीच्या शेअरचा भाव 30 रुपयापर्यंत वाढण्यास वाव आहे.
वाहन कंपन्यातील इशर,अशोक लेलॅंड, महिंद्रा कंपनीचे शेअरचे भाव वाढू शकतात. त्याचबरोबर एचडीएफसी या कंपनीच्या शेअरचे भाव वाढतील असे त्यांना वाटते. त्याचबरोबर नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी इंडिगो दिवाळीत मोठ्या प्रमाणात तेजीत राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केले. आता विमान प्रवास करणाऱ्याची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे या कंपनीची उलाढाल व नफा वाढण्याची शक्यता वाढली असल्याचे त्याना वाटते.