मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला आव्हान देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ या आघाडीची महत्त्वाची तिसरी बैठक महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दिवशी होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करावयाचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, या विषयावर एकमत झालेल्या विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची ही महत्त्वाची बैठक ठरणार आहे. मात्र या बैठकीवरून भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘इंडिया’ आघाडी म्हणजे ‘बारुद नसलेला बॉम्ब’ असल्याची टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटले की, “इंडिया आघाडीचे घटकपक्ष मुंबई बैठकीसाठी एकत्र आले आहेत. ही त्यांची नौटंकी असून ते मुंबईत येतील, हॉटेलमध्ये राहतील, दोन दिवस फिरतील आणि परत निघून जातील. त्यांच्या बैठकीत कोणतेही तथ्य नाही. या आघाडीत कुणीही कुणासोबत नाही. आघाडीतील १० ते १२ पक्ष असे आहेत की, त्यांचा कुठेही आमदार खासदार किंव्हा मंत्री नाही. पंतप्रधान मोदींच्या विरोधात महाराष्ट्रात काही करता येईल का, असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपाच्या ४५ पेक्षा अधिक लोकसभा जागांवर विजय होईल,”असा दावा बावनकुळे यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीच्या बैठकीत बोलवले नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांची भूमिका कधीही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला पटली नाही. कॉंग्रेस नेहमीच डॉ. आंबेडकरांविरुद्धच राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कॉंग्रेसनेच केला होता. तेव्हाही आणि आजही त्यांची भूमिका कायम आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात जो कुणी त्यांच्या संकल्पाला साथ देण्यासाठी येईल त्यांचे एनडीएमध्ये स्वागत केले जाईल.”
दरम्यान, ‘इंडिया’ आघाडीची मुंबईतील ही तिसरी बैठक असून यापूर्वी झालेल्या दोन बैठकांमध्ये काही प्राथमिक चर्चा झाली असली तरी मुंबईच्या बैठकीमध्ये अजून काही निश्चित गोष्टी ठरू शकतात. आघाडीच्या स्थापनेसाठी पहिली बैठक बिहारची राजधानी पाटणा येथे झाली होती, तर दुसरी बैठक कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे झाली होती.