बेलसर – संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पुरंदर तालुक्यातील मुख्य पालखी महामार्ग सोबतच पर्यायी मार्गात अनेक अडचणी निर्माण झाले आहेत. बेलसर उरुळी कांचन रस्त्यावरील शिंदवणे घाटमाथ्यावरील पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
शिंदवणे घाटमाथ्यावरील पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पंप हाऊस जवळील पुलाचे काम मागील 25 एप्रिल रोजी पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते; परंतु एक महिना उलटून देखील पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. पुढे संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचा पर्यायी मार्ग म्हणून या मार्गाचा वापर केला जातो. दोनही पालख्यांना जोडणारा महत्त्वाचा पर्यायी मार्ग म्हणून हा मार्ग ओळखला जातो; परंतु या अपुऱ्या असलेल्या पुलामुळे वाहनांना अधिकचा वेढा पडणार आहे.
अत्यंत संथ गतीने या पुलाचे काम सुरू असल्याने पालखी सोहळ्याच्या दरम्यान मोठा प्रश्न या पुलाच्या रखडलेल्या कामामुळे उभा राहणार आहे. तर जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने पालखी महामार्गाच्या मुख्य रस्त्यांवर भेटी देऊन अडचणी समजून घेतल्या; परंतु पालखी महामार्गाचे पर्यायी मार्ग तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पर्यायी मार्गही वाहनास वाहतुकी योग्य करून द्यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
शिंदवणे घाट माथ्यावरील पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पालखी सोहळा जवळ आला आहे. या रस्त्यावरुन रहदारी वाढली आहे. पालखी सोहळ्यात हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. त्वरीत काम पूर्ण करावे, असे चेतन मेमाणे उपसरपंच, पारगाव मेमाणे म्हणाले.