– अरुण गोखले
लेकराने मातेकडे, याचकाने दात्याकडे, भक्ताने भगवंताकडे काही मागायचे नाही तर कोणाकडे मागायचे? मागणी आणि त्या मागणीची पूर्तता या दोन्हीही मागणाऱ्याच्या आणि देणाऱ्याच्या अगदी स्वाभाविक गोष्टी आहेत. मागणारा मागतो आणि देणारा देतोही. पण परमार्थात भक्त भगवंताकडे काय मागतो, याला जास्त महत्त्व आहे.
संत नामदेवांनीसुद्धा आपल्या लाडक्या विठ्ठलाकडे मागणी केली. पण ती कशाची तर मोक्ष मुक्तीची नाही, तर त्यांनी भक्तीची मागणी केली. त्यांच्या लेखी एका भक्ताच्या दृष्टीने मोक्ष मुक्तीपेक्षाही ईश्वराच्या निखळ भक्तीस आणि त्या भक्तीप्रेमास फार महत्त्व होते. म्हणूनच की काय आपल्या जीवनाची परिपूर्णतः करीत नामदेवरायांनी आपले जीवितकार्य पूर्ण करून जेव्हा विठ्ठलाकडे समाधीची परवानगी मागितली तेव्हा देव म्हणाला, “बा नामदेवा! तू म्हणतोस ते अगदी खरं आहे.
तू माझी जन्मभर भक्ती केलीस, सेवा केलीस, माझे गुणगान गायलेस. आता तुला खरंच विश्रांतीची गरज आहे. तेव्हा चल, बोल केव्हा येतोस तू माझ्याबरोबर वैकुंठ नगरीस, ते मोक्ष सुख भोगायला?’ त्यावर नामदेवराया म्हणाले, “देवा मी समाधी घेणार आहे. मी तुझ्याबरोबर त्या वैकुंठात येणार नाही. कारण मला तुझे ते मोक्ष मुक्तीचे सुख नको आहे, तर मला भक्तीचा आनंद आणि तुझ्या जवळीकतेचा सुखानंद भोगायचा आहे. ते म्हणतात-
नलगे तुझी भुक्ती नलगे तुझी मुक्ती ।
मज आहे विश्रांती वेगळीच ।।1।।
माझें मज कळलें माझें मज कळले ।
माझे मज कळले प्रेम सुख ।।2।।
आपण देवाकडे मुक्ती नाही तर भक्ती का मागतोय हे सांगताना ते म्हणतात, “देवा! अरे तू मला मुक्ती दिलीस ना की माझ्या एकट्या जीवाचा उद्धार होईल. पण मला ते सुख एकट्याला नको आहे. तुझ्या भक्तीतच जे मुक्तीचे विलक्षण सुख आहे ते मला स्वत:बरोबरच इतरांनाही द्यायचे आहे. त्यासाठीच मी तुझ्याकडे भक्ती मागतो आहे. देवा मला जर तू तुझ्याजवळ स्थान देणारच असशील, तर ते तुझ्या महाद्वारातील पायरीशीच दे.’
“तुझ्या पायरीला निवास करून राहिलो की भक्तभाविकांची, साधू-संतांची चरणधूळ मस्तकी लागेल. तुझ्या नाम संकीर्तनाच्या श्रवणानी माझे कान तृप्त होतील. तुझे नाम गाता गाता माझी वाणी धन्य होईल आणि जो देवापासून विभक्त नाही तो खरा भक्त, या भक्तांचा नामावळीत माझे नाव गोवले जाईल.’