– अरुण गोखले
आर्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात एके ठिकाणी मनुष्याला एक अत्यंत मोलाचा सल्ला दिलेला आहे. ते म्हणतात की, बाबानो! तुम्ही हे कायम लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमीच घातक असतो. त्याने नाश होतो. म्हणून तुम्ही काय करा? तर अति सर्वत्र वर्जयेत.
म्हणजेच कशाचाही अतिरेक हा आपल्याकडून होणार नाही किंवा कोणतीही गोष्ट ही अति असू नये याकडे लक्ष द्या. आपण हे असे का सांगतोय हे पटवून देण्यासाठी ते याच श्लोकात काही उदाहरणेही देतात. ते म्हणतात की-
अतिरुपेण वै सीता अतिगर्वेण रावण:।
अतिदानात् बलिर्बद्धो अति सर्वत्र वर्जयेत्।।
याचा अर्थ असा की- आपल्याकडे मराठी भाषेत “अति तेथे माती’ ही जी म्हण आहे ना? त्याच म्हणीचा जणू काही पुरस्कार हा या श्लोकात आचार्यांनी केलेला आहे. इथे आचार्यांनी काही उदाहरणे देऊन कोणतीही गोष्ट ही जर अति झाली तर तीच नाशास कशी कारणीभूत होते.
ते सांगितले आहे. ते म्हणतात की, अति सुंदरतेचे वरदान हे सीतामाईंना लाभले होते हे जरी खरे असले. तरी तिची ती सुंदरताच रावणास तिच्याबद्दल मोह, आसक्ती निर्माण करण्यास कारणीभूत झाली आणि सीतेचे हरण केले गेले.
रावणाने देखील आपल्या शक्ती-सामर्थ्याचा अति गर्व केला. त्यामुळेच त्याचा सर्वनाश झाला. इतकेच नाही तर दानशूर लोकांच्या यादीत ज्याचे नाव अग्रेसराने घेतले जाते तो बळीराजा हासुद्धा त्या छोट्याशा वामनमूर्तीस तू काय हवे ते माग. या बळीराजाच्या दारातून कोणी याचक कधीही विन्मुख परत जात नाही.
तू मागशील ते हा दानशूर बळीराजा तुला हसत हसत देईल, असं म्हणाला, खरा आणि तिथेच त्याचा घात झाला. त्यास तीन पावलात स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ पादाक्रांत करून वामनाने पाताळात लोटले. हे त्या अति दानशूरतेतूनच घडले, हे विसरून कसे चालेल. त्यामुळेच आचार्य म्हणतात की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच असतो हे लक्षात ठेवायला हवे.