Amol Kolhe : वाहतूक पोलिसांकडून ( Traffic Signal ) सरकार वसूली करून घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांनी केला आहे. ऑनलाईन दंड वसूल करण्यासाठी पोलिसांना टार्गेट दिलं जात असल्याचा दावा कोल्हेंनी केला. तसेच, वाहतूक पोलिसांना वसूलीच्या सूचना नेमक्या कोणाकडून दिल्या जातात? असा सवाल देखील अमोल कोल्हेंनी यावेळी उपस्थित केला आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना मुंबईत आलेला एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यांनी शिंदे सरकारवर चांगलीच टीका केली आहे. आपल्या व्हिडिओत अमोल कोल्हे म्हणतात की, “आजचा धक्कादायक अनुभव…! मुंबईत सिग्नलवर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले.
मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेतली. त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात 25000 रूपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असे आदेश असल्याचे सांगितले. तो मेसेज पाहून मला धक्काच बसला. मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000 प्रति दिन म्हणजे, फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये जमा होतात.
इतर शहरांचं काय?… त्यामुळे संबंधित मंत्रीमहोदयांनी आणि अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास, वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का? याची जनतेला माहिती मिळेल. शेवटी ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली” असा टोलाही कोल्हे यांनी लगावला.