शिवसेनेने गृहमंत्र्यावर केली जोरदार आगपाखड
मुंबई – दिल्ली दंगलीच्या विषयावरून शिवसेनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार आगपाखड केली आहे.दिल्ली निवडणुकीच्या काळात घरोघरी हिंडून पक्षाची प्रचार पत्रके वाटणारे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्लीच्या दंगलग्रस्त भागात कुठेच कधी दिसले नाहीत असे शिवसेनेने आपल्या पक्षाच्या मुखपत्रात म्हटले आहे.
वास्तविक दिल्ली पोलिस हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. पण दिल्लीत 38 बळी गेले असतानाही आणि लाखो रूपयांच्या मालमत्तेची हानी झालेली असतानाही अमित शहा मात्र कोठेच दिसले नाहीत हे आश्चर्यकारक आहे. कॉंग्रेस सत्तेवर असताना दिल्लीत जर अशीच परिस्थिती उद्भवली असती तर याच भाजपवाल्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोर्चे काढले असते. पण आता असे घडणार नाही कारण आज भाजप सत्तेवर आहे. आता कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी अमित शहांचा राजीनामा मागितला आहे. जेव्हा अमित शहा अहमदाबादला डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतात व्यस्त होते त्यावेळी दिल्लीत इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्याची हत्या झाली होती.
तीन दिवसांनंतर मोदींना शांततेचे आवाहन करण्यास वेळ मिळाला. आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दिल्लीतील लोकांशी बोलताना दिसले. दिल्ली दंगलीच्या काळात अमित शहांच्या दिल्लीतील अनुपस्थितीचा विषय विरोधक संसदेच्या अधिवेशनात लाऊन धरतील आणि कामकाज रोखून धरतील असेही शिवसेनेने म्हटले आहे. दिल्ली दंगलीचा विषय विरोधकांनी संसदेत उपस्थित केला तर त्यावेळीही त्यांना देशद्रोही म्हटले जाईल काय असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे. दिल्लीत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणाच्या अनुषंगानेही शिवसेनेने सरकारला धारेवर धरले आहे.