ब्रिगे. हेमंत महाजन
सेनेत महिलांना स्थायी कमिशन देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं महिला अधिकाऱ्यांना संधीपासून दूर ठेवणं केवळ भेदभाव नाही तर अस्वीकारार्ह निर्णय आहे, असं सांगतानाच “केंद्र सरकारनं आपला या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलावी’, सोबतच, केंद्रानं सर्व महिला अधिकाऱ्यांना येत्या तीन महिन्यांत सेनेत स्थायी कमिशन द्यावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.
2010 मध्ये दिलेल्या निकालात महिलांना नौदलात कायमस्वरूपी नेमणुका करण्याबाबतचा आदेश दिला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अपील करून संरक्षण खात्याने या विषयातील आपली भूमिका जाहीर केली की हा आदेश पाळणे शक्य नाही.
“आपण स्त्रीला पंतप्रधान, राष्ट्रपती, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून पाहू शकलो. पण सामान्य महिलेला देशाच्या आत सुरक्षा देऊ शकलो नाही. देशात सामान्य महिलांना प्रथम सुरक्षा प्रदान करावी, त्या नंतर सिमांवरती तैनाती बघता येईल, असे काही टीकाकारांना वाटते.
देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वोत्तम खांद्यावरच
युद्धामध्ये, युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा दहशतवादी विरोधी अभियानामध्ये सोशल प्रयोग करता येत नाही. अनेकांना वाटते की ही लढाई सैन्यांमध्ये पुरुष आणि स्त्री या मधल्या समान हक्काची आहे. त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपले सीमेवरचे शत्रू हे पाकिस्तानी आणि चिनी सैनिक आहेत. देशाच्या सैनिकांना दहशतवादी आणि माओवाद्यांशी लढावे लागते. ही लढाई अतिशय कठीण जगंलामध्ये आणि डोंगरावरती होते. अशा ठिकाणी महिला अधिकारी किती यशस्वी ठरतील?
लष्करामध्ये सध्या अनेक भागात महिला अधिकारी कार्यरत आहेत. सुरुंग पेरणे, सुरुंग निकामी करणे अशा प्रकारची कामेही त्या करतात. मात्र युद्धभूमी किंवा युद्धआघाडीवर महिला अद्याप नाहीत. युद्ध आघाडीवर मारले जाण्याची/गंभीर जखमी होण्याची शक्यता असते. मूलबाळ असलेल्या महिला अधिकाऱ्याचे शव युद्धभूमीवरून येईल तेव्हा आपल्या देशाला ते सहन होईल का?
ताकद, स्टॅमिना महत्त्वाचे
शारीरिक क्षमतेच्या दृष्टीने पाहिले तर सामान्य पुरुष हा महिलेपेक्षा 40 टक्के जास्त ताकदवान असतो. एक महिला रिक्रुटची उंची पुरुष रिक्रुटपेक्षा 5 इंचांनी कमी असते. महिलांचे वजन पुरुषांपेक्षा 30 पौंड कमी असते आणि सर्वात महत्त्वाचे- महिलांच्या शरीरामध्ये असलेले स्नायू हे पुरुषांच्या शरीरातील स्नायूंपेक्षा सहा टक्के कमी असतात. यामुळे पुरुष सैनिक महिला जवानापेक्षा जास्त ताकदवान असतो. त्यात जास्त स्टॅमिना असतो आणि तो जास्त चपळ पण असतो. हे सर्व गुण लढाईमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. सैन्यामध्ये झालेल्या एका अभ्यासाप्रमाणे महिलांची हाडे फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा पाच पटींनी जास्त आहे. यामुळे महिलांना आरोग्यदृष्ट्या अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागते.
अर्ध सैनिक दलामध्ये दाखल होण्यासाठी पुरुषांना 3.2 किमीचं अंतर धावण्यास 13 मिनिटांचा कालावधी दिला जातो, तर महिलांसाठी तो निकष 17 मिनिटं आहे. कामावर दाखल झाल्यावरही त्यांना काही सवलती असतात. प्रत्यक्षात सीमेवर त्या गस्त घालतात, पण फक्त दिवसा. त्यांच्या कामाची वेळही सहा तासांचीच असते. पुरुषांना मात्र या सवलती नाहीत.
महिला व पुरुष असा वेगवेगळा विभाग करता येत नाही
ही सगळी कारणे पाहता थेट रणांगणावर लढण्याकरिता महिलांची नियुक्ती भारतात आजवर झालेली नव्हती. सैन्याचे काम असते ते शत्रूला मारणे किंवा त्याला जखमी करणे. अशा कामांकरिता महिलांचा वापर करणे हे सोपे नसते. प्रत्यक्ष लढाई होते त्या वेळेला महिला व पुरुष असा वेगवेगळा विभाग करता येत नाही.
महिलांच्या सुरक्षिततेची काळजी
राष्ट्रीय रायफलमध्ये महिलांना प्रत्यक्ष लढाऊ जबाबदाऱ्या देणे योग्य नाही. महिलांना आघाडीवर पाठवल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र बॅरेक्स, स्वच्छतागृहे आदी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. शिवाय, लढाऊ विभागांमध्ये महिलांच्या समावेशाने युद्धकैद्यांचा प्रश्न अधिक गंभीर होईल. त्याखेरीज, सपोर्टिंग कॉम्बॅट आर्म्समध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश असला तरी त्यातही जोखमीच्या कामांसाठी पुरुष अधिकाऱ्यांना पाठवले जाते. इथे महिलांच्या क्षमतेबाबत शंका घेण्याचा किंवा भेदभाव करण्याचा वरिष्ठांचा दृष्टिकोन नसतो, तर “प्रोटेक्ट’ करण्याची भावना अधिक आढळते.
महिलांच्या सुरक्षिततेची काळजी असल्याने अनेकदा आपल्या हाताखाली महिला घेण्यास अधिकारी काचकूच करतात. विशेषतः जेव्हा महिलांवर एखादी अवघड जबाबदारी सोपवायची वेळ येते, तेव्हा हे अधिकारी अधिकच सावधगिरी बाळगतात. त्यामुळे ज्या स्त्री-पुरूष समानतेच्या तत्त्वासाठी महिला इथे येतात, तेच कामाच्या ठिकाणी नाहीसं झालेलं असतं.
देशात निमलष्करी दले व सीएपीएफ अनेक भागात कार्यरत आहेत व तिथे काम करण्याकरिता महिलांकरता योग्य वातावरण आहे. लष्करात 4,101 महिला आहेत, मात्र त्या सहायक विभागांमध्ये म्हणजे सिग्नल यंत्रणा, तंत्रज्ञ, दारूगोळा इ. पुरत्याच सीमित आहेत. भारतीय नौदलात 252 महिला आहेत, मात्र तिथेही त्यांची जहाजांवर आणि पाणबुडीवर नियुक्ती होत नाही. वायुदलात 872 महिला काम करतात. इथे युद्धक्षेत्र सोडलं तर त्यांना इतर सर्व विभागांत समाविष्ट करून घेण्यात आलं आहे.
महिलांनी ताबारेषेवर सेवा बजावणे सध्या शक्य नाही
आपल्याकडे प्रत्यक्ष ताबारेषा, लढाईच्या जागा या अत्यंत कठीण प्रादेशिक जागी, डोंगराळ व दुर्गम जागी आहेत. तेथे कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा नाहीत. सपोर्टिंग आर्म्स म्हणजे इंजिनिअर्स सिग्नल्समध्ये महिलांना अशा आव्हानात्मक स्थितीत जबाबदारी देणे सोपे नाही.
प्रत्यक्ष लढण्याच्या वेळी पुरुष आणि स्त्री अशी काही विभागणी नक्कीच नसणार. “रात्रीच्या वेळेला महिलांना पहारा करण्यासाठी तैनात ठेवणे तितकेसे सुरक्षित नाही. पुरुषांपेक्षा महिला बौद्धिक व मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत. किंबहुना शिस्तपालन व सहकाऱ्यांशी सौहार्दाने वागणं, परिपक्वता या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा सरस असल्याचं दिसलं आहे. अशा ठिकाणी त्यांची तैनाती केली जाते, ती केली जावी, कारण ती योग्य आहे.