– अरुण गोखले
अशीच एक सत्संगाची पवित्र संध्याकाळ. आपल्या समोर बसलेल्या संसारी प्रापंचिक जीवांना नामसाधनेच्या नौकेत बसवून परमार्थाच्या पैलतीराकडे घेऊन जाणारे सद्गुरू. समोर बसलेल्या भक्तभाविकांपैकी कोणा एका भक्ताने महाराजांना प्रश्न केला की, ‘महाराज! तो परमात्मा चराचरात भरलेला आहे. तो सर्वव्यापी, सर्वसाक्षी आणि सर्व घटी निवास करणारा आहे, हे तर सर्व शास्त्रपुराणे यांनी सांगूनच ठेवलेले आहे. खरं ना? मग आम्हाला जर त्याच ईश्वराचा शोध घ्यायचा असेल त्याला बघायचा असेल, तर आम्ही त्याला कुठे आणि कसा शोधायचा?’
तो भक्तभाविकांचा प्रातिनिधिक प्रश्न ऐकला आणि महाराजांना मोठा आनंद झाला. ते म्हणाले, ‘वा! छान. तुम्हाला इतक्या लवकर त्या ईश्वर शोधाची इच्छा होतेय हे खूपच छान आहे. तुम्ही असं करा…’
‘काय करू? कुठे जाऊ? कोणत्या वाटेने जाऊ?’ पुढचे काही प्रश्न. त्यावर समजावणीच्या स्वरात महाराज म्हणाले, ‘बाबांनो! हा शोेध घ्यायचा आहे ना मग त्यासाठी एक करा. एका शांत प्रसन्न ठिकाणी शांत चित्ताने बसा… डोळे मिटा आणि तुम्हीच तुमच्या आत डोकावून पहा आणि त्याला शोधा.’ ‘काय डोळे मिटून एका जागी बसून त्याला शोधू? ते कसं शक्य आहे?’ एक शंका. तेव्हा त्या शंकेचे निरसन करीत महाराज म्हणाले, ‘बाबांनो! हा ईश्वराचा शोध असाच उलटा आहे. तो बाहेर नाही तर आत शोधायचा आहे.
तोही डोळे मिटून म्हणजेच बाह्य जगाकडे लागलेली दृष्टी अंतर्मुख करून.आपल्याच हृदयाच्या गाभार्यातला अंतरात्मा हेच त्या परमात्म्याचे आपल्यातले छुपे रूप आहे. तोच आपल्या शरीरात चैतन्य, चेतना रुपाने नटलेला आहे. हृदयीच्या आत्मारामाची ओळख होणे, हाच देव शोधण्याचा खरा अर्थ आहे. इथे आपण डोळे मिटायचे ते ह्या बाह्य जगाकडे आणि दृष्टी लावायची ती अंतरीच्या आत्मारामाकडे.
एकदा का हा तुमचा आत्माराम तुमचा तुम्हाला सापडला. त्याची नेमकी खूण कळली की न सांगता न बोलता तुमचा तुमच्याच आत्मारामाशी सुखसंवाद चालू होतो. तू का राम? तू का राम असे विचारत गेले की तोच उत्तर देतो होय मीच तो. तो अंतरीचा आत्माराम समजला की बाह्यशोध थांबतो आणि तोच आतला बाहेरच्या विश्वात दिसू लागतो.’