नवी दिल्ली – केंद्र सरकारने आयडिया-व्होडाफोन कंपनीकडे असलेल्या येणे व्याज रकमेचे कंपनीच्या समभागात रूपांतर केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे या कंपनीचे सर्वाधिक समभाग झाले आहेत.
त्यामुळे कंपनीचे नियंत्रण सरकारकडे गेले असले तरी सरकारने आपल्याला ही कंपनी चालवण्यात स्वारस्य नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कंपनीच्या सध्याच्या व्यवस्थापनाकडेच कंपनी चालवण्याची जबाबदारी असून आम्ही त्यासाठी पूर्ण कटिबद्ध आहोत असे कंपनीच्या सीईओंनी म्हटले आहे.
केंद्र सरकारचे या कंपनीकडे व्याजाचे 16 हजार कोटी रुपये येणे होते. त्या रकमेचे इक्विटीत परावर्तन करण्यात आले आहे. म्हणजेच तेवढ्या रकमेचे समभाग सरकारकडे गेले आहेत. एकूण समभागांपैकी या समभागांचे प्रमाण हे 35.8 टक्के इतके आहे.
ते भागधारकांपैकी सर्वाधिक आहे. त्यामुळे केंद्र सरकार हे या कंपनीचे सर्वात मोठे शेअर होल्डर झाले आहे. कंपनीचे सीईओ रविंदर ठक्कर यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने ही कंपनी चालवण्याची सारी सूत्रे सध्याच्याच व्यवस्थापनाकडे ठेवली आहेत आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत असे त्यांनी नमूद केले. आयडिया-व्होडाफोन ही कंपनी सध्या प्रचंड तोट्यात असून कंपनीचा एकूण तोटा 1 लाख 95 हजार कोटींवर गेला आहे.