सोलापूर – चीनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढायला सुरुवात झाल्याने इतर देशांनी देखील खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सक्षम आहे. नवीन वर्षाची सुरुवात अनेकजण देवाचे दर्शन करून करतात. अशात देवस्थानांनी देखील कोरोना बाबतची खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर प्रशासनाने याविषयी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
नवीन वर्षानिमित्त भक्तांची मंदिरात गर्दी होणार ही बाब लक्षात घेऊन अक्कलकोट मंदिर प्रशासनाने आतापासूनच काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. स्वामी समर्थ मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसेच भक्तांनी मंदिरात मास्क घालूनच यावं असे आवाहन देखील मंदिर प्रशासनाने केले आहे. यासोबतच मंदिर समितीने भक्तांना मास्कच वाटपही केलं आहे.
स्वामी समर्थ मंदिरासह शिर्डी साईबाबा,कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराने देखील करोना बाबतची खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. चीनमधून करोनाबाबतची अपडेट येताच महाराष्ट्रासह केरळ,युपी, गुजरात,दिल्ली अशा प्रमुख राज्यांनी देखील खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यासोबतच इंडियन मेडिकल असोसिएशनकडून काळजी घेण्याबाबतची नियमावली जारी करण्यात आली आहे.