मुंबई – राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. अजित पवारांनी आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिबिरात अजित पवार गैरहजर राहणार असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
उद्या घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय कार्यकर्ता शिबिर होणार आहे. मात्र या शिबिराच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकात कुठेही अजित पवार यांचे नाव नाही. त्यामुळे अजित पवार या शिबिराला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महत्त्वाच्या अशा कार्यक्रमात अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा रंगली आहे.
या शिबीरात शरद पवारांसह जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे, अनिल देशमुख यांची यावेळी उपस्थिती असणार आहे. मात्र, या सर्व वरिष्ठ नेत्यांमध्ये अजित पवारांचे नाव वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
“ध्येय राष्ट्रवादीचे… मुंबई विकासाचे…’ या शिर्षकाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे 2 हजारहून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थिती, महिला असुरक्षितता, महागाई, बेरोजगारी, परराज्यात जाणारे उद्योग, महापुरुषांचा अवमान, वोट बॅंक मिळवण्याच्या नादात लोकांच्या जीवाची पर्वा न करणे, सुशोभिकरण प्रकल्पाच्या अंतर्गत मुंबईचे खरे रूप दडवणे, नागरी सुविधा प्रश्नांवर पूर्णपणे दुर्लक्ष करणे अशा व इतर विविध मुद्यांवर या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरामध्ये चर्चा व मार्गदर्शन केले जाईल.
राष्ट्रवादीची “शिवसेना’होऊ नये
“जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार,’ असे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मंगळवारी भाजपशी हातमिळवणीच्या चर्चेला पूर्णविराम दिला तरीही राज्यातील संभाव्य राजकीय भूकंपाच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. राष्ट्रवादीचे सुमारे 38 ते 40 आमदार भाजपसोबत जाण्यास उतावीळ आहेत. मात्र शरद पवार राजी होत नाहीत. त्यामुळे भाजप शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही मोठी फूट पडू शकते, अशी भीती शरद पवारांना वाटते आहे. त्यामुळे त्यांनी अजितदादांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली आहे. इतकेच नव्हे, पक्षाच्या आमदारांशी ते फोनवर चर्चा करून मन जाणून घेत आहेत. त्यांना संयम राखण्याच्या सक्त सूचनाही देत आहेत.