मुंबई – राज्य करोनाच्या दुसऱ्या लाटेचा येऊन मुकाबला करत असताना लसीकरणात होणाऱ्या विलंबाने करोनाच्या तिसऱ्या लाटेचा मार्ग खुला होऊ शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
लसीचे पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने एक मे पासून 18 वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण सुरू करता येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केल्याच्या पार्शवभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. राज्याला लसीचा कमी प्रमाणात पुरवठा होत आहे, त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.
पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी कौन्सिल हॉलला बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. “भारतात सुरुवातीच्या काळात लस विदेशात पाठवण्याची गरज नव्हती. जर केंद्राने लस विदेशात पाठवली नसती तर आज आपल्या देशात लस तुटवडा झाला नसता. मात्र आता किमान तेवढ्याच प्रमाणात लस आयात करण्याची सोय करावी,” असं लसीकरण ठप्प झाल्याच्या मुद्यावर अजित पवारांनी मोदी सरकारवर थेट आरोप केले आहे.