मुंबई – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. त्यात अपेक्षेप्रमाणे भरात असलेल्या अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आला आहे. संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच कायम ठेवण्यात आलेले असले तरीही उपकर्णधारपद कोणाकडे सोपवण्यात आले आहे ते अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. येत्या 7 ते 11 जून या कालावधीत इंग्लंडमधी ओव्हल मैदानावर हा सामना होणार अससून त्यासाठी एक जास्तीचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.
शिवसुंदर दास यांनी जाहीर केलेल्या संघातून अपेक्षेप्रमाणे सुमार कामगिरी करत असलेल्या सूर्यकुमार यादवला बाहेरच ठेवण्यात आले आहे. तसेच अष्टपैलूच्या जागेसाठी हार्दिक पंड्यापेक्षा शार्दुल ठाकूरचा विचार करण्यात आला व त्याला संधी देण्यात आली आहे. पंधरा खेळाडूंच्या संघात डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही स्थान मिळू शकले नाही.
पंधरा महिन्यांनंतर रहाणे परतला
जानेवारी 2022 साली रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला सुमार कामगिरीमुळे संघातून वगळले गेले होते. इतकेच नव्हे तर त्याला केंद्रिय करारातूनही बाहेर ठेवले गेले होते व त्याच्याकडून संघाचे उपकर्णधारपदही काढले गेले. मात्र, यंदाच्या आयपीएल स्पर्धेत प्रचंड भरात असलेल्या रहाणेने अखेर आपली दखल घ्यायला भाग पाडली.
तसेच इंग्लंडमध्ये तेथील वातावरणात खेळण्याचा त्याचा अनुभवही त्याच्या संघातील निवडीसाठी महत्वाचा ठरला. रहाणेने आतापर्यंत भारताकडून 82 कसोटी सामने खेळताना 38.52 च्या सरासरीने 4 हजार 931 धावा केल्या आहेत. 188 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तसेच त्याच्या नावावर 12 शतके व 25 अर्धशतके आहेत.
राहुलवरच सातत्याने विश्वास का?
भारतीय संघातील खेळाडू पाहिले तर लोकेश राहुल हा एकच यष्टीरक्षक संघात आहे. त्याला पर्यायही कोणी नाही. गरज पडली तर रहाणे यष्टीरक्षण करू शकतो हे खरे असले तरीही इशान किशनसारख्या नवोदिताला डावलून अत्यंत सुमार कामगिरी करत सातत्याने टीकेचा धनी बनलेल्या राहुलचीच निवड वारंवार का केली जाते याचे उत्तर मात्र शिवसुंदर दास यांच्या निवड समितीसह बीसीसीआयनेही देण्याचे टाळले आहे.
इशान किशानवर अविश्वास का?
यष्टीरक्षक इशान किशन उपलब्ध असतानाही त्याला संधी डावलण्यात आली आहे. राहुलवर विश्वास दाखवताना इशानला सातत्याने संधी का दिली जात नाही व त्याच्यावर विश्वास दाखविला जात नाही.