कोपरगाव – यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून, लहान-मोठे तलाव व विहिरी कोरड्याच आहेत. पिण्यासाठी व सिंचनासाठी पाण्याची नितांत गरज आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडले तर गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे शासनाने जायकवाडीत पाणी सोडण्यापूर्वी उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील जनतेवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे स्पष्ट मत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी मांडले.
मेंढेगिरी समितीच्या अहवालातील शिफारशीप्रमाणे नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत येत्या 17 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत जायकवाडीच्या वरच्या भागातील नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीत 10 टीएमसी पाणी सोडणार असल्याचे समजते.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत हा पाणी सोडण्याचा निर्णय अमलात आला तर त्याचा मोठा फटका गोदावरी डावा आणि उजवा कालव्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कोपरगाव, राहाता व अन्य तालुक्यांना बसणार आहे. या परिसरातील लोकांची पाण्याची गरज न भागवता जायकवाडीत पाणी सोडले गेल्यास आगामी काळात या भागातील शेतकऱ्यांना व जनतेला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.. शासनाने मेंढेगिरी समितीच्या जाचक शिफारशीचा फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.