रवींद्र कदम
नगर – वाहतूकीचे नियम पायंदळी तुडवत बेभान होऊन दुचाकी चालवणे चांगलेच अंगलट आले आहे. तर काहींच्या जिवावर बेतले आहे. नुकताच शहर वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात तब्बल 1 हजार 451 अपघात झाले असल्याचे आकडेवारीमध्ये पुढे आले आहे. त्यात दुचाकीचे सर्वाधिक 637 अपघात झाले असून 318 जणांचा मृत्यू झाला आहे.
छत्रपती संभाजी नगर-पुणे, तसेच नगर मनमाड या महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहेत. वाहने भरधाव वेगाने वाहन चालवणे, हेल्मेट चा वापर न करणे, दुचाकीवर मोबाईल चा वापर करणे असे विविध कारणाने हे अपघात होत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
पोलीस प्रशासनाकडून वाहतूक नियमाबाबत वेळोवेळी आवाहन केले जाते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने बेभान चालवल्याने अपघात होत आहे. जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 637 अपघात झाले आहे. त्या अपघातात 694 जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये दुचाकीचे सर्वाधिक अपघात असून या अपघातात 318 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा महिन्यात 588 अपघात झाले. त्यात 848 जण गंभिर जखमी झाले. तर 160 साधे अपघात त्यात 249 किरकोळ जखमी झाले. 66 अपघातात वाहनांचे नुकसान झाले असल्याचे आकडेवारी मध्ये समोर आले आहे. त्यात सर्वाधिक अपघात नगर तालुक्यातील जेऊर, पांढरीपूल तसेच चास, सुपा, एमआयडीसी परिसर, निंबळक, विळद, वांबोरी फाटा या परिसरात सर्वाधिक अपघात झाले आहे.