महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अनपेक्षितपणे उद्भवलेल्या बंडामुळे अवाक झालेला महाराष्ट्र अजून पुरेसा सावरलेला नाही. या अनुषंगाने जे प्रश्न निर्माण झाले आहेत त्याची जटिलता अनेक पत्रकार परिषदांमुळे कमी होण्याऐवजी चांगलीच वाढलेली दिसली आहे. या सगळ्या भानगडीत राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये कोणाकडे नेमके किती आमदार आहेत हे आज दुसऱ्या दिवशीही स्पष्ट झालेले नाही. आज अजित पवारांची संध्याकाळी बैठक झाली. त्यावेळी ते आपल्यामागे असणाऱ्या आमदारांचा नेमका आकडा सांगतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी तो काही सांगितला नाही. त्यांच्या शेजारी बसलेले प्रफुल्ल पटेल तर म्हणाले की, आमच्याकडे आमदारांचा आकडा विचारण्यापेक्षा त्यांच्याकडे किती आमदार आहेत हे प्रथम त्यांनी सांगावे.
त्यामुळे या अनुषंगाने जे प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यात पुन्हा अनेक कायदेशीर कटकटी उद्भवणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचा पक्ष फुटल्यानंतर वर्ष झाले, पण त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांची अजून पूर्ण उकल झालेली नसतानाच महाराष्ट्रात हे नवीन प्रकरण उद्भवले आहे. अपेक्षेप्रमाणे आपला पक्षच खरा असल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून सुरू झाला असून दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या नेत्यांची हकालपट्टी आणि अपात्रता घोषित करणाऱ्या घोषणा केल्या आहेत. आज शरद पवारांच्या गटाकडून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या हकालपट्टीची घोषणा झाली आहे, त्याच वेळी आज अजित पवारांच्या गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या पदावरून उचलबांगडी झाल्याची घोषणा झाली आहे.
आज अजित पवारांनी त्यांच्यावतीने पक्षाचे नवीन पदाधिकाऱ्यांची व विविध सेल प्रमुखांच्या नावांची घोषणा केली. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. नंतर मग तटकरे यांनी पक्षाच्या नव्या गटाच्या अन्य पदाधिकाऱ्यांची नावे घोषित केली आहेत. या सगळ्या घडामोडीत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला आणि त्यावर त्यांनी शरद पवार हे उत्तर दिले आहे. जर शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असे जर अजित पवार हा गट मान्य करीत असेल तर त्या अधिकारात शरद पवार पुढील जो निर्णय घेतील तो या गटाला मान्य करावा लागेल आणि त्यातूनही अनेक कायदेशीर कटकटी निर्माण होणार आहेत. हा मुद्दा त्यांनी लक्षात घेतलेला दिसत नाही.
या लढाईत कायदेशीर कटकटी आमच्या बाजूने उभ्या केल्या जाणार नाहीत, असे कालच शरद पवार यांच्या गटाकडून सांगण्यात आले होते, पण मध्यरात्रीच जितेंद्र आव्हाड यांची पक्षाचे नवीन प्रतोद म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांना अपात्र ठरवण्याची सूचना विधानसभेच्या अध्यक्षांना सादर केली आहे. तसेच पक्षाच्या विधानसभेच्या प्रमुखपदी म्हणजेच विरोधी पक्ष नेतेपदावरही जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे आणि तसे पत्रही त्यांच्यावतीने विधानसभेच्या अध्यक्षांना देण्यात आले आहे. त्यावर प्रतिक्रिया म्हणून अजित पवार गटाकडून आज आव्हाडांच्याच हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खरा प्रतोद कोण, कोणाचा व्हीप चालणार, कोणाला पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळणार अशा साऱ्या प्रश्नांची मालिका महाराष्ट्रात पुन्हा नव्याने सुरू होणार आहे.
हे प्रकरण आता जसे विधानसभा अध्यक्षांकडे गेले आहे तसेच ते निवडणूक आयोगाकडेही गेले असून शरद पवार गटाकडून ई-मेलद्वारे आमचा गटच खरा पक्ष असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसऱ्या गटाचा कोणताही निर्णय मान्य करण्यापूर्वी आमची अनुमती घेतली जावी, असे त्यांच्याकडून निवडणूक आयोगाला सांगण्यात आले आहे. हे प्रकरण आता फक्त कोर्टाच्या अखत्यारीत जाण्याचे बाकी राहिले आहे, सध्याचा सारा रागरंग पाहता पुढील काळात तोही प्रसंग उद्भवेल हे नक्की. अर्थात त्या साऱ्या प्रश्नांची उकल होण्यात वर्षभराचा काळ सहज निघून जाईल; पण तोपर्यंत विधानसभेची मुदतच संपेल आणि नव्याने निवडणुका लागतील. त्यामुळे हा कालावधी कसा तरी निपटून नेण्याचा जो अजित पवार गटाचा उद्देश आहे तो साध्य होईल, हे अगदी स्पष्ट आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या काळात खरी कसोटी भाजपची लागणार आहे.
त्यांनी आधीच शिंदे गटाच्या चाळीस आमदारांचे ओझे खुशीने स्वीकारले आहे. त्यातच आता हा नवीन गट त्यांच्या बाजूला आला आहे. त्यामुळे त्यांचेही वेगळे ओझे भाजपला वाहायचे आहे. त्यामुळे मूळ भाजपमध्ये जे निष्ठावान आहेत त्यांच्यापुढे अस्तित्वाचा धोका निर्माण झाला आहे. त्यातून भाजपपुढेही महाराष्ट्रात मोठा प्रश्न तालुक्या-तालुक्यात उभा राहणार आहे. पण त्या स्थितीची चिंता भाजपने केलेली नाही. त्यांना विरोधी आघाडीत भगदाड निर्माण करून ही आघाडी विस्कळीत होत असल्याचे चित्र जनतेपुढे निर्माण करायचे होते, ते त्यांनी साध्य केले आहे. भाजपपुढे आज सगळ्यात मोठा प्रश्न लोकसभा निवडणुका कशा जिंकायच्या, हा आहे. विरोधकांची भक्कम आघाडी निर्माण झाली तर आपली डाळ शिजणे अवघड असल्याची जाणीव झाल्याने विरोधी पक्षांमध्ये मोठी फाटाफूट निर्माण करून त्यांच्याविषयी जनतेत अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा भाजपचा मुख्य हेतू आहे.
त्याच उद्देशाने महाराष्ट्रात फोडाफोडीचे तंत्र अवलंबले गेले आहे, हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. सकृतदर्शनी त्यात भाजपला यश आल्याचे वरकरणी दिसत असले तरी ज्यांच्यावर आपण भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना तुरुंगात घालण्याऐवजी त्यांना थेट मंत्रिपदी नेमले हे जनतेला कितपत रूचेल, याचा विचार भाजपने केलेला नाही. त्याचा फार मोठा फटका भाजपला नजीकच्या काळात बसल्याशिवाय राहणार नाही. शेवटी ही लढाई त्यांना जनतेच्या न्यायालयातच न्यावी लागणार आहे, तेथे मतदारांचे राज्य चालते. महाराष्ट्रातील या साऱ्या किळसवाण्या राजकीय घडामोडीने सामान्य मतदार उद्विग्न झाला आहे, तो यावर सारासार विचार करून निर्णय घेईल आणि हा सारा सत्तेचा विकृत खेळ ठोकरून लावेल. या राजकारण्यांनी निर्माण केलेल्या साऱ्या प्रश्नांची उकल जनतेलाच आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने करावी लागेल.