शिर्डी – साई समाधी मंदिरात दर्शनासाठी जाताना शिर्डी ग्रामस्थांची सुरू असलेली अवहेलना संस्थान प्रशासनाने त्वरित थांबवावी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते व माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
साईसमाधी मंदिर परिसरात ग्रामदैवतांची मंदिरे असून, गेल्या कित्येक वर्षांपासून या देवतांचे दर्शन शिर्डीतील ग्रामस्थ व भाविक मोठ्या श्रद्धेने घेतात परंतु अलीकडच्या काळात ग्रामस्थांना या देवताच्या दर्शनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे शिर्डी ग्रामस्थांसाठी गेट नं. 3 येथे विशिष्ट दर्शनरांगेची व्यवस्था केली आहे, परंतु त्याठिकाणी असणारे सुरक्षारक्षक अनेकवेळा ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक देत आहेत.काही प्रशासकीय अधिकारी व सुरक्षा अधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून हे सर्व सुरक्षारक्षक शिर्डी ग्रामस्थांची अवहेलना करत आहे, असा गंभीर आरोप कैलासबापू कोते यांनी केला असून, यावर त्वरित तोडगा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
वास्तविक लेंडीबाग, नंदादीप, दत्त मंदिर, गणपती मंदिर, शनी मंदिर, महादेवाचे मंदिर याठिकाणी भाविकांना व ग्रामस्थांना जाताना मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. कारण साईसमाधी मंदिराला असणारे पाचही गेटवर वेगवेगळे नियम लागू असून, त्या माध्यमातून सुरक्षारक्षकांकडून ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात कुचंबना सुरू आहे. तसेच नुकताच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंदिर परिसरात चप्पल बंदीचा आदेश काढल्याने मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या अनेक भाविकांच्या पायाला जखमा होतात. त्यामुळे त्यांच्या जीवितेचा प्रश्न उभा राहिला आहे. संस्थानच्या अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे दररोज वेगवेगळे नियम लावण्यात येत असून, असे अधिकारी अनेक वर्षांपासून त्या पदावर कसे कार्यरत आहे, असा परखड सवाल करत या बेबंदशाहीला व मुजोर झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या सर्व गंभीर घटनेची माहिती देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे कोते यांनी सांगितले आहे.
साई संस्थानमधील बेबंदशाही आणि मुजोर कारभार करणारे आणि अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसणारे प्रशासकीय अधिकारी यांना त्वरित हटवावे व त्यांच्या जागेवर कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी व ग्रामस्थांना मंदिर परिसरात सन्मानपूर्वक वागणूक द्यावी या सर्व मागण्या संस्थान प्रशासनाने पूर्ण न केल्यास सर्व शिर्डी ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार आहेत.
– अभय शेळके पाटील, माजी उपनगराध्यक्ष, शिर्डी