पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशावरून सुरू असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत एका महिन्यात १ लाख ११ हजार १२२ मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत. आयोगाच्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाने मतदार याद्या पुनरीक्षण मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत मतदार यादीमध्ये नव्याने नावे समाविष्ट करणे, नाव, पत्ता आदींमध्ये बदल करणे, मतदार यादीतून नाव वगळणे आदी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आलेल्या अर्जांमध्ये मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी आलेल्या अर्जांची संख्या ५६ हजार ८४२ एवढी आहे. तर नावात, पत्ता बदलासाठी आलेल्या अर्जांची संख्या २६ हजार ७८० एवढी आहे. मृत व्यक्तींचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी आलेल्या अर्जांची संख्या जवळपास २७ हजार ५०० एवढी आहे. त्यापैकी आतापर्यंत ४९ हजार ६८३ अर्जांवर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.
कागदपत्र पूर्ततेसाठी प्र्शासनाकडून केली जाते मदत
मतदार नाव नोंदणीसाठी दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीमध्ये ज्या अर्जदारांची कागदपत्रे अपुरी आहेत. त्यांना प्रशासनामार्फत दूरध्वनी करून त्यांची पूर्तता करण्यास सांगितले जाते. तसेच अर्जातील काही त्रूटी दर करण्यासाठी प्रशासनाकडून मदत केली जाते. नागरिकांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.
विशेष मोहिमेमुळे मतदारसंख्येत वाढ
जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या २६ हजार ५८० होती. प्रशासनाने युवक मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे ही संख्या ४४ हजार २९९ पर्यंत वाढली आहे. तर २० ते २९ या वयोगटातील मतदारासांची संख्या १२ लाख ६८ हजार ६५ एवढी आहे.