बारामती तालुक्यातील नीरा वागज हे बागायती पट्ट्यातील आर्थिकदृष्ट्या सधन गाव. गावाला राजकीय वारसादेखील मोठा आहे. तालुका, जिल्हा, तसेच राज्यपातळीवर नीरा वागज गावाने राजकीय महत्त्व अधोरेखित केले आहे. राजकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यात स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. राजकीय व सामाजिक वाटचाल करीत असताना विकासाची गंगा गावात आणली आहे. अशातच निरा वागजच्या माजी सरपंच अनिता गणपत देवकाते यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची चुणूक दाखवत गावच्या विकासाचा आलेख उंचावला आहे. गावातील विविध पायाभूत सुविधांसह महिलांचे सक्षमीकरण यावर भर देत गावाचा कायापालट करणाऱ्या माजी सरपंच अनिता देवकाते यांच्या कार्यावर दै. प्रभातने टाकलेला हा प्रकाशझोत…
अनिता देवकाते यांचा जन्म 21 मे 1975 मध्ये झाला. मोरवे (ता. खंडाळा, जि. सातारा)हे त्यांचे माहेर. दहावीचे शिक्षण झाल्यानंतर 23 मे 1991 रोजी त्यांचा विवाह नीरा वागज येथील प्रगतशील बागायतदार शंकरराव देवकाते यांचे सुपुत्र गणपत देवकाते यांच्याशी झाला. गणपत देवकाते हे उच्चशिक्षित. देवकाते कुटुंबीय नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर. नीरा वागज ग्रामपंचायत सदस्यपदी गणपत देवकाते हे सलग वीस वर्षे सदस्य म्हणून कार्यरत राहिले. नीरा वागजचे सरपंचपदही त्यांनी भूषविले.
सरपंचपदाच्या माध्यमातून त्यांनी गावातील पायाभूत सुविधांसह शोषित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे नीरा वागजच्या नागरिकांची व त्यांची नाळ घट्ट जुळली आहे. घराघरात त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. त्याची पावती म्हणून त्यांच्या पत्नी अनिता देवकाते यांना ग्रामपंचायत सदस्यपदी संधी मिळाली. त्याचवेळी सरपंचपदाची धुरादेखील त्यांच्याकडे देण्यात आली. महिलांच्या हाती गावकारभार सोपविण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. 15 सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये सर्व महिलांना संधी देण्यात आली.
सरपंच अनिता देवकाते यांनी पतीच्या पावलावर पाऊल टाकत गावाचा विकास करण्यास सुरुवात केली. गावपातळीवर काम करीत असताना त्यांना पतीची साथदेखील मिळाली. गावातील दहा हजार नागरिकांसाठी विविध विकासकामे करीत त्यांनी गावाला एक चांगली ओळख निर्माण करून देणाऱ्या आदर्श सरपंच म्हणून आजही त्यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रवादीचे नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनातून विकास झाल्याचे सरपंच अनिता गणपत देवकाते सांगतात. वाघेश्वरी महिला प्रतिष्ठानची निमिर्ती करून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा त्यांचा मानस आहे.
तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळविणार
गावाला मंदिरांचा वारसा आहे. गावात वाघेश्वरी माता मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महादेव मंदिरांचा बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आला आहे. सरपंच अनिता देवकाते यांची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्तुत्य उपक्रम
बचत गटांचे मेळावे, हळदी-कुंकू समारंभ, स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, महिलांना घेऊन विधिमंडळ कामकाजाची पाहणी, मंत्रालय पाहणी, अभ्यासदौरे, राळेगणसिद्धीला भेट दिली. यातून महिलांना सर्व घटकांचे बारकावे समजून गावविकासात योगदान देता यावेत, हा हेतू खऱ्या अर्थाने त्यांनी फलद्रूप केला आहे.
आदर्श गृहिणी
सरपंच म्हणून गावचा कारभार पाहात असताना त्यांनी एकत्रित कुटुंबाची धुरादेखील तेवढेच तत्परतेने सांभाळली आहे. आदर्श सून, आदर्श पत्नी, तसेच आदर्श आई म्हणून त्यांनी घराला घरपण दिले आहे. 14 सदस्यांचे एकत्रित कुटुंबातील एक मुख्य धागा बनून त्या राहिल्या आहेत. आईवडील तसेच सासू पार्वती शंकर देवकाते यांच्या संस्काराची शिदोरी घेऊन त्यांनी कुटुंबातील प्रत्येकाशी नाते जोपासले आहे. पती गणपत देवकाते यांच्या समाजकार्यात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्या आहेत. गावविकासात हे कुटुंब केंद्रबिंदू राहिले आहे. मुलगा विकीदादा यास अभियांत्रिकी तर शुभम कला पदवीचे यास शिक्षण दिले आहे.
कार्यकाळातील विकासकामे
महाराष्ट्र जलजीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना, अंगणवाडीचे बांधकाम, समाजमंदिर, सभामंडप बांधकाम, धार्मिक आरोग्य उपकेंद्रासाठी प्रयत्न पाठपुरावा, दिवाबत्तीची सोय, वैयक्तिक शौचालय वाटप, गावातील रस्ते. संजय गांधी निराधार योजनेतून निराधार यांना आधार. वृद्धापकाळ पेन्शन योजनांमधून अनेक लाभार्थ्यांनी आधार दिला आहे.
संस्कारमय कुटुंब आदर्शवत्
अनिता देवकाते या 14 सदस्यांचे एकत्रित कुटुंबातील एक मुख्य धागा बनल्या आहेत. एक संस्काराची शिदोरी घेत कुटुंबातील प्रत्येकजण वाटचाल करीत आहे. हे आदर्शवत् कुटुंब गावविकासात हातभार लावत आहे. त्यांनी समाजकारण, राजकारणात झोकून देऊन काम केल्याने परिसरात देवकाते कुटुंबाचा आदराने उल्लेख केला जातो. त्यांनी महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना स्वयंसिद्धा बनविले आहे. अनिता देवकाते यांची मुले उच्चशिक्षित आहेत. उच्च शिक्षणामुळे गाव स्वयंपूर्ण बनू शकते त्यासाठी घराघरातील मुले-मुली उच्च शिक्षित झाले पाहिजे असे माजी सरपंच अनिता देवकाते आवर्जून सांगतात.
संकलन : प्रमोद ठोंबरे, बारामती (तालुका प्रतिनिधी).