पुणे – बुधवार पेठेतील देहविक्रय करणाऱ्या महिलांचे हक्क व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वैविध्यपुर्ण उपक्रम राबविणाऱ्या ऍड.श्रीकांत ठाकूर यांना रणरागिणी महिला सोशल फाऊंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय “डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. तासगाव उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या हस्ते ऍड.ठाकूर यांना गौरविण्यात आले. ऍड. ठाकूर यांनी देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या हक्कासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी उपक्रम राबविले आहेत.
“एक दिवा शिक्षणासाठी’, देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या हस्ते राखीपौर्णिमा या त्यांच्या उपक्रमाची समाजाने दखल घेतली आहे. त्यांनी कोरोना कालावधीमध्ये देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी जेवणाची पाकीटे, अन्नाधान्य व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा, सॅनिटरी पॅडचे वाटप करण्याबरोबरच सॅनिटायझेनशही केले. ठाकूर यांनी हा पुरस्कार शहर व जिल्ह्यातील महिला वकीलांना समर्पित केला आहे.
“”देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी यापुढेही कायम प्रयत्नशील राहू. विशेषतः त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू.” असे ऍड. ठाकूर यांनी सांगितले.