- विनाकारण दुचाकी-चारचाकीतून फिरणाऱ्या 250 जणांकडून दंड वसूल
- लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई
- नियमांचा भंग करणाऱ्या 37 हॉटेलावर गुन्हा
मळवली – करोनाचा नियमांचे उल्लंघन करत विनामास्क फिरणाऱ्या 2 हजार 200 जणांवर, तर दुचाकी-चारचाकी वाहनांमधून विनामास्क व “फिजिकल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे उल्लंघन करत विनाकारण फिरणाऱ्या 250 जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. याशिवाय नियमांचा भंग करणाऱ्या 37 हॉटेलावर गुन्हा दाखल करण्यात आला. 1 रेशनिंग दुकानासह अन्य 16 दुकांनावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.
मावळ तालुक्यातील सर्वाधिक कडक कारवाई लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केली आहे. यामुळे ग्रामीण पोलीस हद्दीतील गावांमध्ये करोना रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या व पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लवटे, पोलीस उपनिरीक्षक निलेश माने व कर्मचारी वर्ग यांनी नाकाबंदी, गस्त, कारवाई व स्पिकरद्वारे जनजागृती मोहिमा राबवत हद्दीत चोख नियोजन केले आहे.
करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात यावी याकरिता शासनाने कडक निर्बंध लागू केलेले असताना काही नागरिक या नियमांचे उल्लंघन करत बिनधास्तपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कडक कारवाई करत अंकुश ठेवला आहे. ग्रामीणची पोलीस यंत्रणा अतिशय संवेदनशीलपणाने काम करत असल्याने ग्रामीण भागात करोना रुग्णसंख्या नियंत्रणात राहिली आहे.
पुढील काळात शासन आदेशाची कडक अंमलबजावणी करत नियमांचे पालन न करणारे नागरिक, व्यावसायिक, हॉटेल चालक यांच्याकडे कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले.
विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई
पवनानगर – महाराष्ट्र शासनाने लावलेल्या “ब्रेक द चेन’ बरोबरच वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांचा पवनमावळ परिसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पवन मावळातील पवनानगर ही 40 गावांची मुख्य बाजारपेठ आहे. या ठिकाणी मोठी वर्दळ असते. मात्र महाराष्ट्र शासनाने लावलेल्या “ब्रेक द चैन’ विकेंड लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवली होती. करोनासारख्या महामारीला नष्ट करण्यासाठी सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले, तर करोना प्रादूर्भाव कमी होऊ शकतो, यासाठी सर्वांनीच प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. तरच आपण करोनाचा नायनाट करु शकतो. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पवनानगर बाजारपेठेत पोलीस नाईक संतोष शेळके, सुनील गवारी, भीमराव वाळुंज यांनी मुख्य चौकात बंदोबस्त लावला असल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. जे विनाकारण फिरत होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.