– हिमांशू
आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये? आपण सगळे ‘ब्लॅक अँड व्हाइट’ झालोय. म्हणजे ज्यांना चांगलं पाहायचंय त्यांना सगळं चांगलंच दिसतंय आणि ज्यांना वाईट पाहायचंय त्यांना सगळं वाईटच दिसतंय. विषय कोणताही असो, दोन टोकं असलीच पाहिजेत आणि त्यापैकी एक टोक आपण पकडलंच पाहिजे, अशी आपली धारणा झालीये. आजूबाजूचं वातावरण आणि समाजमाध्यमं आपल्याला दोन टोकांकडे खेचू पाहतात. परंतु या टोकांदरम्यान बरंच काही असू शकतं किंबहुना असलं पाहिजे, हा विचारही आपल्या मनाला शिवेनासा झालाय. कोणत्याही थराला जाऊन आपलं म्हणणं योग्य आहे किंवा दुसर्या टोकाला बसलेल्या माणसाचं म्हणणं चूक आहे, हे पटवून देता आलंच पाहिजे.
आपलं मत पटवायला नाहीच जमलं तर समोरच्याचं म्हणणं किमान दुर्लक्ष करण्याजोगं आहे, एवढं तरी आपण स्पष्ट करू शकतो आणि करतोच! परंतु या मानसिकतेमुळे आपल्याकडे संवादाची असंख्य आधुनिक माध्यमं असूनसुद्धा आपला संवाद खुंटलाय. अनेक विषय कायमचे दुर्लक्षित झालेत तर अनेक विषय पुढं ढकलण्याची खोड आपल्याला लागली. गेल्या महिनाभराच्या कालावधीत जगभरातल्या अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी ‘ले-ऑङ्ग’ जाहीर केले. काही कंपन्यांनी शेकड्यात तर काही कंपन्यांनी हजारात माणसं नोकरीवरून काढली. जेवढ्या लोकांनी नोकर्या गमावल्या, तेवढी कुटुंबं संकटात आली. परंतु यासंदर्भातल्या बातम्या चर्चेविना नजरेआड गेल्या!
नव्या नोकर्या निर्माण होण्याची गती आपल्याला ठाऊक आहेच.
‘नवीन स्किल्स शिका,’ असं अनेकजण कानीकपाळी ओरडून सांगत असले तरी गेल्या काही दिवसांतल्या दोन बातम्या खरोखर चिंता वाढवणार्या आहेत. एक आयआयटी मुंबईसंदर्भातली आहे आणि दुसरी आयआयटी दिल्ली आणि कानपूरशी संबंधित आहे. ज्या संस्थांमधून शिक्षण घेणार्यांना आपण ‘क्रीम’ म्हणतो, अशा या संस्था. परंतु मुंबई आयआयटीमधून शिकलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी न मिळणं हा चिंतेचा विषय झालाय. लागोपाठ दोन वर्षे या विद्यार्थ्यांना मिळणार्या नोकर्यांमध्ये घट झालीये. नोकरीसाठी नोंदणी करणार्यांपैकी 35.8 टक्के विद्यार्थ्यांना आजअखेर नोकरी मिळालेली नाही.
दुसरीकडे दिल्ली आणि कानपूर आयआयटीमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची परिस्थितीही काही वेगळी नाही. या संस्थांचा ‘प्लेसमेन्ट सीझन’ पूर्वीच्या तुलनेत खूपच ‘कोरडा’ गेल्याचं वृत्त आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार आयआयटी दिल्लीच्या गेल्या तीन वर्षांमधील संस्थात्मक रँकिंग ङ्ग्रेमवर्कचा डेटा संकलित करण्यात आला. ङ्गेब्रुवारीअखेर किती पदवीधरांना नोकर्या मिळाल्या, याचा उल्लेख उत्तरात आहे. परंतु नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा उल्लेख मात्र नाही.
दरवर्षी डिसेंबर-ङ्गेब्रुवारीत आयआयटीमध्ये प्लेसमेन्ट्स आयोजित केल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या नजरा या दोन महिन्यांकडे लागलेल्या असतात; परंतु यावर्षीची ङ्गेब्रुवारीची आकडेवारी चांगले संकेत देणारी नाही. आयआयटीमध्ये शिक्षण घेता यावं, यासाठी विद्यार्थी हायस्कुलात असल्यापासून तयारी करतात. मात्र, बड्या कंपन्या हजारो कर्मचार्यांना घरी बसवू लागल्यात आणि नव्या नोकर्यांची तर वानवा आहेच.