– हिमांशू
काही दिवसांपूर्वीच असंख्य गोष्टींना “जलसमाधी’ मिळाल्याच्या बातम्या दुथडी भरून वाहिल्या. यात माणसांचा, घरांचा, दुकानांचा, महागड्या गाड्यांचा आणि त्याबरोबरच स्मरणशक्तीचाही समावेश असावा. वारंवार येणाऱ्या महापुराचं कारण शोधण्याच्या शहाणपणाला तर कधीच “जलसमाधी’ मिळालीय; पण आपण “त्यावेळी’ ज्या कारणासाठी ओरडत होतो त्याच्याबरोबर उलट कारणासाठी “आज’ ओरडत आहोत,
याचाही विसर काही महनीय व्यक्तींना पडला होता. असो! निसर्गाला नीतिमत्तेची साथ मिळाली असती तर नियम पाळले गेले असते; पण आजकाल नीतिमत्तेऐवजी आपली केवळ बुद्धिमत्ता चालते आणि तीही फक्त मालमत्ता निर्माण करण्यासाठी! काही दिवसांनी महापुराप्रमाणेच त्याची चर्चाही ओसरेल आणि तुटपुंज्या मदतीनंतर त्याही विषयाला “जलसमाधी’ मिळेल.
वास्तविक, आपण आपल्यातल्या संवेदनशीलतेलाच “जलसमाधी’ दिलीय आणि म्हणूनच छत्तीसगडमध्ये ज्याच्या आईला जलसमाधी मिळाली, तो दंतेवाडा डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचा (डीआरजी) जवान आपल्याला दिसत नाही आणि जलसमाधी मिळता-मिळता दोन लहानग्या मुलींना वाचवणारा नांदेडचा युवकही आपल्याला दिसत नाही.
या दोन्ही घटना माणूस म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाला विचलित केल्याखेरीज राहणार नाहीत. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सोमवारी ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून चार जण मृत्युमुखी पडले. अपघात झाला त्याच वेळी डीआरजीचे जवान या नक्षलग्रस्त भागात “सर्चिंग’साठी निघाले होते. अपघातग्रस्तांचा आरडाओरडा ऐकून ते थांबले आणि शक्य तेवढ्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी जवानांनी तलावात उड्या घेतल्या.
वसू कवासी नावाचा जवान या पथकात होता. जवानांनी अनेकांचे प्राण वाचवल्यानंतर काहीजण उलटलेल्या ट्रॉलीखाली अडकले असल्याचं जवानांच्या लक्षात आलं. त्यांना बाहेर काढण्यासाठी जवानांनी बुड्या मारल्या तेव्हा एका महिलेचा मृतदेह वसूच्या हाती लागला. पाण्याबाहेर येताच त्याला तो मृतदेह आपल्याच आईचा असल्याचं समजलं. फुके कवासी हे या आदिवासी महिलेचं नाव.
आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी जाताना हा अपघात झाला होता आणि बचावकार्य करणाऱ्या मुलालाच आईचा मृतदेह बाहेर काढावा लागला. वसूच्या मनात त्यावेळी काय कल्लोळ उडाला असेल, याची कल्पना आपण पूरग्रस्त भागात बचावकार्य करणाऱ्या जवानांकडे पाहून केली तरी पुरेसं आहे. परंतु तेवढी संवेदनशीलता खरोखर आपल्यात उरलीय का? हाच प्रश्न आहे. नांदेडच्या एजाजची कहाणी तर भलतीच आहे.
नदीत बुडणाऱ्या दोन मुलींचे प्राण वाचवल्याबद्दल 2018 मध्ये त्याला “राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’ मिळाला होता. दिल्लीला प्रजासत्ताकदिनी अभिमानानं त्याने तो स्वीकारला असेल. परंतु आज… अवघ्या तीन वर्षांनी या शूरवीराची परिस्थिती काय आहे? केळीचे घड ट्रकात भरणारा हमाल म्हणून तो काम करतोय. त्याने शौर्य गाजवलं तेव्हा त्याच्यावर मदतीच्या घोषणांचा अक्षरशः पाऊस पडला होता; पण प्रत्यक्षात हाती काहीच नाही!
नांदेडच्या कॉलेजात विज्ञान शाखेत एजाज अब्दुल रऊफ नदाफ हे नाव हजेरीपटावर आलं. सुरुवातीला थोडे पैसे कॉलेजात जमा झाले. बारावीच्या प्रवेशावेळी मात्र काहीच मिळालं नाही, म्हणून त्याने घराजवळच्या कॉलेजात कला शाखेत प्रवेश घेतला.
तिथंही परीक्षा फी भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडलं. पाच जणांच्या कुटुंबात सगळ्यात लहान असूनसुद्धा आज त्याला हमाली करावी लागतेय. जलसमाधी मिळता-मिळता दोन जीव वाचवणाऱ्या एजाज अब्दुलच्या शौर्यालाच आज “जलसमाधी’ मिळालीय.