– हिमांशू
“प्रत्येक माणसाची गरज पूर्ण करण्याची क्षमता पृथ्वीकडे आहे; पण कोणाचीही हाव ती पूर्ण करू शकत नाही’, हे महात्मा गांधींचे विचार आज आपण विसरून गेलो. पैशाला अवास्तव महत्त्व प्राप्त झालं आणि आपण पैशांमागे आंधळेपणानं धावू लागलो. निसर्गाच्या नरडीला नख लावून विकास नावाची प्रक्रिया गतिमान केली; पण आर्थिक उन्नती म्हणजेच विकास, अशी आपण या प्रक्रियेची व्याख्या संकुचित करून ठेवली. विषमता आणि अस्वस्थता, ही या प्रक्रियेची अपत्यं होत. आर्थिक विकास ही बहुसंख्य लोकांसाठी एक शोकेस ठरली. एक जीवघेणी, आंधळी शर्यत सुरू झाली आणि आपण त्यात खूप मागे आहोत, हे शल्य ज्याला टोचू लागलं, त्याच्यासमोर स्वतःचा बळी देणं किंवा नैतिकतेचा बळी देणं, हे दोनच पर्याय उरले. फसवणुकीला, हुजरेगिरीला आणि गुन्हेगारीला ऊत आला.
पैसा कुठून येतो याला समाज महत्त्व देत नाही; पण तो जवळ असला तर लोक आपल्याला मुजरा करतात, हे लक्षात आल्यामुळे विधिनिषेध सोडून काही माणसं पैशाचा पाठलाग करू लागली. जुन्या दैववादी मानसिकतेवर हावरटपणाचं कलम झालं आणि काहीजण गुप्तधनाचा शोध घेऊ लागले. यातून जे महाभयानक प्रकार घडतात, ते काळजाचा ठोका चुकवणारे असतात. गुप्तधनासाठी माणसं मांत्रिक-तांत्रिक, काळी जादू, गंडेदोरे, अंगारे-धुपारे करू लागतात.
पण भाबडेपणापासून सुरू झालेली अंधश्रद्धेची मिरवणूक बेभान वळणं घेत कधी-कधी क्रौर्याच्या दारात जाऊन पोहोचते आणि गंभीर गुन्ह्याला जन्म देते. मालेगाव तालुक्यातल्या छोट्याशा गावात नऊ वर्षांचा मुलगा खेळता-खेळता गायब होतो. संध्याकाळपर्यंत मुलगा घरी परतला नाही, म्हणून शोधाशोध सुरू होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर शोध लागत नाही, तेव्हा पोलिसात तक्रार नोंदवली जाते. चार दिवसांनी गावाजवळच्या जंगलात मुलाचा मृतदेह पुरून ठेवल्याचं गावकऱ्यांना समजतं. पोलीस घटनास्थळी आल्यावर मृतदेह बाहेर काढला जातो, तेव्हा त्याच्या डोक्यावरचे केस काढल्याचं दिसून येतं.
मग गावकऱ्यांच्या लक्षात येतं, की मुलगा बेपत्ता झाला त्या दिवशी अमावास्या होती. अंधश्रद्धेच्या संशयातून तपास त्या दिशेनं वेग घेऊ लागतो. संशयित त्याच गावातले असल्याचे धागेदोरे मिळतात आणि एकाला अटक केली जाते. त्यानं दिलेल्या कबुलीच्या आधारे आणखी तिघेजण पोलिसांच्या सापळ्यात अडकतात आणि हा प्रकार गुप्तधनाच्या लालसेपोटी घडल्याचंही समोर येतं. माणूसपणाला काळिमा फासणाऱ्या या घटनेतला एक संशयित फरारी आहे. त्याला अटक होईल, खटला उभा राहील, संशयित दोषी ठरल्यास त्यांना शिक्षा होईल. पण एक प्रश्न तरीही अनुत्तरित राहतो. ज्याला अजून जगाची पुरती ओळखही झालेली नाही, अशा पोराला गळा चिरून मारण्याची तयारी केवळ गुप्तधनाच्या लालसेतून होतेच कशी?
काहीही न करता आपल्या हाती घबाड लागावं आणि आपण झटपट श्रीमंत व्हावं, ही लालसा या घटनेमागे आहेच; पण त्याहून भयानक आहे ती अंधश्रद्धा. काहीजण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक करतात, तर काहीजण श्रद्धा या शब्दातच अंधत्व अध्यहृत आहे, असं मानतात. इतक्या खोलात जाण्याची गरज नाही; पण जेव्हा श्रद्धेला स्वार्थाची जोड मिळते, तेव्हा ती श्रद्धा राहते का? हा प्रश्न तरी पडलाच पाहिजे.