- एकाचा मृत्यू, सहा वर्षांच्या बालिकेसह नऊ जखमी
देहूरोड – बेंगळुरू-मुंबई महामार्गावर मालवाहू ट्रकवर खासगी प्रवासी बस मागून जोरदार धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर सहा वर्षांच्या बालिकेसह नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. किवळे-रावेतजवळ सोमवारी (दि. 11) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
बजरंग भगवान गायकवाड (वय 40, रा. कासाराळ, उदगीर, जि. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर कल्पना रुपेश मांडेकर (वय 23, रा. टाकादेवी, ता. अलिबाग, जि रायगड), रुपेश शामराव भांडेकर (वय 27, रा. टाकादेवी, ता. अलिबाग, जि. रायगड), श्रुती सुनील सूर्यवंशी (वय 6), सविता सुनील सूर्यवंशी (वय 26, रा. उंब्रे, ता. खालापूर, जि. रायगड), किशोर नवरखेळे (वय 19), शोभा नवरखेळे (वय 50), मनिषा नवरखेळे (वय 21, रा. सेवानगर, घोडबंदर, मुंबई), भिमराव कांबळे (वय 52), वनिता भिमराव कांबळे (वय 40, रा. कांदिवली, मुंबई) असे गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बेंगळुरू महामार्गावर लातूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसने (एम.एच. 43 एच 4750) पुढे जाणाऱ्या मालवाहू ट्रकला (एम. एच 05 /ए.एम/2307) पाठीमागून जोरदार धडकल्याने भीषण अपघात झाला. बसमध्ये 49 प्रवाशी प्रवास करीत होते.
बजरंग गायकवाड यांचा मृत्यू झाला, तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्यावर औंध येथील शासकीय रुग्णालय व देहूरोड एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.