मुंबई – मुंबईत लसीकरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू असून या शहरात आत्तापर्यंत 42 लाख लोकांना लसींचे दोन्ही डोस देण्यात आले असून 82 लाख लोकांना किमान एक डोस देण्यात आला आहे.
शहरातील सध्याची करोना नियंत्रणाची स्थिती लक्षात घेतल्यानंतर शहरात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही, असे मुंबई महापालिकेतर्फे हायकोर्टात स्पष्ट करण्यात आले आहे. करोनाच्या बाबतीत मुंबई आता सुरक्षित आहे असेही महापालिकेचे वकील अनिल साखरे यांनी आज त्या विषयावर झालेल्या सुनावणीच्यावेळी सांगितले.
75 वर्षांच्यावरील व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन करोना लसीचे डोस देण्यात यावेत असा आदेश केंद्र व राज्य सरकारांना द्यावा, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे, त्यावर सध्या ही सुनावणी सुरू आहे. त्यावेळी मुंबई महापालिकेच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.
मुंबईत पायलट प्रोजेक्ट म्हणून अंथरूणात खिळून राहिलेल्या रुग्णांना त्यांच्या घरी जाऊन कोविड लसीचे डोस दिले जात असल्याची माहिती राज्य सरकारच्या वकिलांनी दिली आहे. केंद्र सरकारनेही हेच धोरण अवलंबण्याची घोषणा केली आहे त्यामुळे या जनहित याचिकेला काही अर्थ उरलेला नाही असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. त्यानंतर कोर्टाने ही जनहित याचिका निकाली काढली.