नवी दिल्ली – शेतकऱ्यांना यंदा प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळाली आहे. या आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात तब्बल 60 टक्क्यांपेक्षाही अधिक घट झाली आहे.
या योजने अंतर्गत सन 2020-21 सालात देशभरातील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून केवळ 9570 कोटी रूपये इतकीच नुकसान भरपाई मिळाली आहे. त्या आधीच्या वर्षात म्हणजे सन 2019-20 या वर्षात शेतकऱ्यांनी एकूण 27 हजार 398 कोटी रूपयांचे नुकसान भरपाईचे दावे सादर केले होते.
प्रधान मंत्री फसल विमा योजना सन 2016-17 साली देशात सुरू करण्यात आली होती. या योजनेचा शेतकऱ्यांना म्हणावा तसा लाभ होत नसल्याची सार्वत्रिक ओरड होती. त्याची दखल घेऊन 2018 च्या रबीच्या हंगामात आणि 2020 च्या खरीप हंगामात यातील ऑपरेशनल गाईडलाईन्स बदलण्यात आल्या.
ज्या योगे शेतकऱ्यांना खात्रीशिर लाभ मिळावा आणि त्यांचा लाभ पुरेशा प्रमाणात त्यांना वेळेवर मिळावा असा प्रयत्न करण्यात आला. सन 20-21 या काळात देशातील 6 कोटी 12 लाख शेतकऱ्यांनी 445 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी हा विमा उतरवला होता. हा विमा एकूण 1 लाख 93 हजार 767 कोटी रूपयांचा होता. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना केवळ 9 हजार 570 कोटी रूपयांचाच क्लेम अदा करण्यात आला आहे.
यावर कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की, यंदा शेतीचे फार नुकसान झालेले नाही त्यामुळे कमी नुकसान भरपाई अदा करावी लागली आहे. त्यातही शेतकऱ्यांचे सन 2019-20 सालचे एकूण 1200 कोटी रूपयांचे दावे अजून अदा झालेले नाहीत.