प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 – संपूर्ण देशात आकर्षणाचा विषय असलेल्या पुण्याच्या श्री गणेशविसर्जन मिरवणुकीची सुरुवात ही मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीने होते. यंदा दोन वर्षांची मरगळ झटकून मानाच्या गणपतींची मिरवणूक विक्रमी म्हणजे सुमारे 10 तास चालली. शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरू झालेला मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा रात्री पावणेनऊच्या सुमारास मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीच्या विसर्जनाने संपला. पुण्याची वैभवशाली गणेशोत्सवाची दोन वर्षे खंडीत झालेली विसर्जन मिरवणूक यावर्षी जोमाने सुरू झाली.
मंडई येथील टिळक पुतळ चौकात ग्रामदैवत कसबा गणपती, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, गुरूजीतालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे गणपती सभामंडपातून मिरवणुकीने आले. या गणपतींचे पूजन विविध मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च, तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार माधुरी मिसाळ, आमदार रोहित पवार, माजी मंत्री आणि युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, कॉंग्रेसह शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदी उपस्थित होते. यानंतर मिरवणुकीला सुरूवात झाली. मुस्लीम बांधवांनीही यामध्ये सहभागी होत मानाच्या दोन गणपतींच्या पालखीचे ते सेवेकरी झाले आणि त्यांनी पाच पावले पालखी वाहिली.
मानाचा पहिला-कसबा गणपती
(विसर्जन वेळ : 4.15 मि.)
सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीने निघालेली कसबा गणपतीची चांदीची पालखी सव्वाअकरा वाजता लक्ष्मी रस्त्यावर आली. तत्पूर्वी त्यांचा नगारखाना रमणबाग, रुद्रगर्जना, कलावंत ही ढोल-ताशा पथके, प्रभात बॅंड, कामायनी प्रशालेचे विद्यार्थी, बॅंक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी आदी सहभागी झाले होते. या पथकामध्ये कलावंत ढोल-ताशा पथकांचाही समावेश होता. हे पथकात कलावंत मंडळी सहभागी असतात. त्यामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले आदी सहभागी झाले होते. दुपारी 2 वाजून 49 मिनिटांनी नगारखाना टिळक चौकात आला आणि त्यानंतर दुपारी
3 वाजून 12 मिनिटांनी कसबा गणपतीची पालखी चौकात आली. सर्व पथकांनी तेथे वादन केले. त्यानंतर दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी त्याचे विसर्जन करण्यात आले. मागील वेळेपेक्षा दहा मिनिटे आधी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
मानाचा दुसरा – तांबडी जोगेश्वरी
(विसर्जन वेळ : 5.37 मि.)
सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीला सुरूवात झाली. सतीश आढाव यांचा नगारा आणि पारंपरिक पोषाखातील अश्वारूढ कार्यकर्ते हे याचे वैशिष्ट्य होते. याशिवाय न्यू गंधर्व बॅंड पथक, समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल-ताशा पथके यामध्ये सहभागी झाली होती. याशिवाय “विष्णूनाद’ हे शंखवादकांचे पथक, लाठी-काठी, तलवारबाजीची प्रात्यक्षिके करणारी लहानमुले तसेच मोठी मुले-तरुणी यांचा समावेश होता. चांदीच्या पालखीत विराजमान झालेले बाप्पा सुमारे एक वाजता बेलबाग चौकात लक्ष्मी रस्त्यावर म्हणजे मुख्य मार्गावर आले. त्यानंतर सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी गणपती अलका चौकात आला आणि तेथे पुन्हा वादन करून सायंकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.
मानाचा तिसरा – गुरुजी तालीम मंडळ (विसर्जन वेळ : 7.27 मि.)
मंडळाच्या गणपतीच्या मिरवणूक सरपाले बंधू यांनी साकारलेल्या भक्तीरथातून निघाली. अतिशय सुंदर देखणी अशी विठ्ठल रखुमाईची फुलांनी सजवलेली मूर्ती, संतांच्या प्रतिकृती यामध्ये होत्या. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूजा करून गुलाल उधळून मिरवणुकीची सुरूवात झाली. जोगेश्वरी मंडळाचा बाप्पा पुढे गेल्यानंतर सुमारे एक ते दीड तासांनी बाप्पांचा रथ बेलबाग चौकात आला. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांचा नगारावादन पथक होते. याशिवाय गर्जना, शिवगर्जना आणि नादब्रह्मची दोन पथके होती. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अनेक कार्यकर्ते सहभागी असतात आणि गुलालाची मुक्त उधळण होते. त्यानुसार संपूर्ण रस्त्यावर गुलालाची उधळण झाली. त्यानंतर ढोलाच्या तालावर तरुण-तरुणी नाचत होते. सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी गणपती टिळक चौकात आला. तेथेही वादन झाले आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि 7 वाजून 27 मिनिटांनी बाप्पांचे विसर्जन झाले.
मानाचा चौथा गणपती-तुळशीबाग मंडळ (विसर्जन वेळ : 8.01 मि.)
श्रीगजमुख रथामध्ये विराजमान झालेल्या तुळशीबाग मंडळाचा गणपती अतिशय भव्य आणि आकर्षक दिसत होता. फुलांची सजावट, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारत माता रथ, स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी आणि गजर ही ढोलपथके यात सहभागी झाली होती. प्रारंभी लोणकर बंधू यांचा नगारखाना होता. सूर्य मावळल्यानंतर आकर्षक दिव्यांच्या रोषणाईत तुळशीबाग गणपतीची मूर्ती अतिशय मोहक दिसत होती. रात्री 7 वाजून 25 मिनिटांनी बाप्पांचा रथ टिळक चौकात आला. भव्य दिव्य बाप्पांची मूर्ती पाहून अनेकजण नतमस्तक झालेच, परंतु उपस्थितांना त्याची छबी मोबाइलमध्ये क्लिक करण्याचा मोह आवरलाच नाही. तेथे वादन करून रात्री 8 वाजून 01 मिनिटांनी तुळशीबाग गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
मानाचा पाचवा गणपती-केसरीवाडा (विसर्जन वेळ : 8.45 मि.)
मानचा पाचवा केसरीवाडा गणपती बेलबाग चौकातून पुढे निघण्याला सायंकाळचे साडेचार वाजून गेले. त्यानंतर बिडवे बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, श्रीराम, शिवमुद्रा आणि वज्र या ढोल-ताशा पथकांच्या लवाजम्यासह लोकमान्य टिक यांचा केसरीवाड्याचा गणपती लक्ष्मी रस्त्यावर आला. फुलांनी सजवलेल्या मेघडंबरीमध्ये रथामध्ये गणरायाची सोज्वळ मूर्ती विराजमान झाली होती. रात्री 8 वाजून 15 मिनिटांनी केसरीवाड्याचा बाप्पांचा रथ टिळक चौकात आला आणि त्यानंतर पावणेनऊच्या दरम्यान गणेशाचे विसर्जन झाले.