पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यात यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होत आहे. यात बारामती मतदारसंघासाठी दि. 7 मे रोजी मतदान तर पुणे, मावळ आणि शिरुरसाठी दि.13 मे रोजी मतदान होणार आहे. यात विशेषत: दुबार नावे असलेले मतदार दोन्ही ठिकाणी मतदान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे असणार आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदार संघांचा समावेश होतो. राज्यातच नव्हे, तर देशभरात बारामती लोकसभा निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी असलेल्या निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघाचे महत्त्व वेगळे आहे.
पहिल्या टप्प्यात येथे निवडणूक होणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा जोर या मतदार संघात लागणार आहे. मध्यंतरी निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत बारामती मतदारसंघातील दुबार मतदारांचा मुद्दा चर्चेचा विषय झाला होता. एका माजी आमदारांनी याची यादीच प्रशासनाकडे सादर केली होती. ही नावे वगळण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया राबवावी लागते.
प्रशासनाने तक्रारीची दखल घेऊन विशेष मोहीम राबवून दुबार मतदारांची नावे कमी केल्याचा दावा केला आहे. बारामती लोकसभा मतदार संघाची पहिल्या टप्प्यात निवडणूक आणि तेथील राजकीय परिस्थिती विचारात या गोष्टीला महत्त्व आले आहे. दुबार मतदारांबरोबरच बोगस मतदान होणार नाही, यासाठी प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात आले आहेत. काही नावे यादीतून वगळण्यात आले आहेत. जे दुबार मतदार आहेत, त्यांना नोटीस देऊन एकाच ठिकाणी नाव ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीदेखील दुबार नावे असतील, तर ती त्या त्या विधानसभा निवडणुकीतील सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे दुबार मतदान होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. – डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी