श्रीनगर – जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी आणि या ठिकाणी गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी आखाती देशांच्या 36 सदस्यांचे एक शिष्टमंडळ काल श्रीनगरमध्ये पोहोचले.
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम इथल्या पर्यटन स्थळांना काल या पथकाने भेट दिली. जम्मू-काश्मीर हे देशातले गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त पसंतीचं ठिकाण ठरावे यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आखाती देशांमधले उद्योजक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितले. हे शिष्टमंडळ जम्मू काश्मीरमधील संभाव्य उद्योगवाढीसाठी आवश्यक संधींची चाचपणी करणार आहे.