हॅमिल्टन – भारताच्या महिला संघाने यास्तिका भाटिया व स्नेह राणा यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर बांगलादेशचा 110 धावांनी पराभव केला. या विजयामुळे येथे सुरू असलेल्या महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची भारतीय संघाची संधी वाढली आहे.
स्पर्धेच्या साखळी फेरीतील भारताचा हा तिसरा विजय आहे. या विजयाबरोबरच भारत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर विजयासाठी 230 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र बांगलादेशचा संपूर्ण संघ 119 धावांत बाद झाला. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक 4 गडी बाद केले. झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रथम फलंदाजी करताना यास्तिका भाटियाने अर्धशतकी खेळी केली. स्मृती मानधनाने 30, शफाली वर्माने 42, रिचा घोषने 26 तर पूजा वस्त्रकारने नाबाद 30 धावांची खेळी केली. स्नेह राणानेही 27 धावांची आक्रमक खेळी करत संघाला 7 बाद 229 अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.
भारताच्या 230 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशच्या सलमा खातूनने 30 तर लता मोंडलने 24 धावांची खेळी केली. त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या फेरीतील भारताचा अखेरचा साखळी सामना दक्षिण आफ्रिकेशी येत्या रविवारी होणार आहे. हा सामनाही जिंकला तर भारतीय संघ उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित करेल.
संक्षिप्त धावफलक –
भारत – 50 षटकांत 7 बाद 229 धावा. (यास्तिका भाटिया 50, शफाली वर्मा 42, स्मृती मानधना 30, रिचा घोष 26, पुजा वस्त्रकार नाबाद 30, रितू मोनी 3-37, नाहिदा अख्तर 2-42). बांगलादेश – 40.3 षटकांत सर्वबाद 119 धावा. (सलमा खातून 30, लता मोंडल 24, स्नेह राणा 4-30, झुलन गोस्वामी 2-19, पूजा वस्त्रकार 2-26).