- पाणीकपात राहणार कायम, पालिकेकडे उपलब्ध नाही दुसरा पर्याय
पिंपरी – पवना धरण शंभर टक्के भरलेले असताना देखील शहरवासीयांवर लादलेली पाणी कपात दूर होताना दिसत नाही. जोपर्यंत अतिरिक्त पाणी मिळत नाही, तोपर्यंत पाणीकपात कायमच राहणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रशासन अतिरिक्त पाण्याची वाट पाहते आहे, परंतु पाणी गळती आणि चोरी रोखल्यास पाण्याच्या टंचाईची तीव्रता कमी होऊ शकते. प्रशासन पाणी गळती आणि पाणी चोरी कधी रोखणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शहराची लोकसंख्या सध्या 25 लाखांच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. महापालिका प्रशासनाकडून सध्या शहरात दिवसाआड 500 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जात आहे. पवना धरण सध्या 100 टक्के भरलेले आहे. तरीही, शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहरातील सखल भागांमध्ये अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत.
त्याशिवाय, नव्याने विकसित होणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये पाण्याची समस्या गंभीर होत आहे. सोसायट्यांना महापालिकेकडून प्रति कुटुंबासाठी पुरविण्यात येणारे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे काही सोसायट्यांना टॅंकरने पाणी मागवावे लागत आहे. ही वस्तुस्थिती महापालिका प्रशासनही नाकारू शकत नाही.
एक वर्ष काय केले?
सुमारे एक वर्षापूर्वी प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला. त्यावेळी पाणी गळती आणि पाणी चोरी रोखण्यासाठी पथके नेमण्यात आली. अधिकाऱ्यांना हे काम पूर्ण करण्याची मुदतही देण्यात आली. परंतु काहीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. पाणी गळतीची समस्या गंभीर आहे. सध्या हिशेबबाह्य पाणी, पाणी गळती आणि चोरीचे प्रमाण सुमारे 40 टक्के इतके आहे. शहरातील बऱ्याच मोठ्या भागांमध्ये 30 वर्षांपूर्वीच्या जलवाहिन्या आहेत. या जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती होत असते. त्याशिवाय, काही नागरिकांनी जलवाहिन्यांमध्यून बेकायदा कनेक्शन घेतलेले आहे. पाण्याचे नादुरुस्त मीटर, मीटरच नसणे आदी कारणांमुळे महापालिकेला पाणीपट्टीत लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित असताना वर्षभरात प्रशासनाने काय केले? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
भविष्यकालीन नियोजन काय?
शहराची पाच ते दहा वर्षांतील लोकसंख्या वाढ लक्षात घेता पाण्याबाबत भविष्यकालीन नियोजन काय? हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. महापालिका सध्या सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा बंद करण्यासाठी दररोज किमान 30 ते 40 एमएलडी अतिरिक्त पाण्याची गरज आहे. भविष्यातील लोकसंख्या वाढीसाठी मात्र सध्या दिले जाणारे पाणी अपुरे पडणार आहे. ही गरज लक्षात घेऊन आंद्रा धरणातंर्गत देहू बंधारा येथून महापालिका 100 एमएलडी पाणी दररोज उचलणार आहे. त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल. भामा आसखेड धरणातून पाइपलाइनद्वारे 167 एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक पंम्पिग स्टेशन उभारणी आणि जॅकवेलसाठी महापालिका पाटबंधारे विभागाकडून महिनाभरात जागेचा ताबा घेणार आहे.
शहरातील सर्व नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी देण्यासाठी आणि पाण्याबाबतच्या तक्रारींचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा हाच पर्याय सध्या योग्य आहे. देहू बंधारा येथून महापालिकेने 100 एमएलडी पाणी उचलण्यास सुरवात केल्यानंतर हा प्रश्न सुटेल. 4 पॅकेजेस अंतर्गत शहरात 27 पाण्याच्या टाक्या उभारल्या जात आहेत. तसेच, 56 किलोमीटर अंतरात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
– रामदास तांबे, सह-शहर अभियंता (पाणीपुरवठा), महापालिका.