पुणे – सर्वत्र झालेल्या चांगल्या पावासामुळे यंदा देशात भाताची लागवड दहा टक्क्याहुन अधिक वाढली आहे. स्वाभाविकपणे उत्पादन वाढून यावर्षी तांदळाच्या भावात थोडी घट होऊ शकते. या हंगामात प्रत्यक्ष उत्पादन किती होणार आणि निर्यात यावर भाव अवलंबून राहतील, असा अंदाज “फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी वर्तविला.
यावर्षी खरीप हंगामात भाताची लागवड वाढली आहे. देशात विविध भागांत साधारणतः सप्टेंबरपर्यंत शेतकरी भाताची लागवड करतो. अडीच ते तीन महिन्यांत हे पीक काढणीला येते. लवकर येणारे पीक आहे आणि भावही चांगले मिळत असल्याने भाताची लागवड क्षेत्र वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे शहा यांनी सांगितले.
मागील काही वर्षांपासून दरवर्षी भाताच्या लागवडी खालील क्षेत्रात वाढ होत आहे. त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा वाढ झाली आहे. 2019-20 मध्ये देशभरात 354.50 लाख हेक्टर लागवड झाली. त्यामधून सुमारे 1 हजार 175 लाख टन उत्पादन निघाले. ते मागील पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा 10 टक्क्याने अधिक आहे.
यावर्षी 390 लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावर भाताची लागवड झाली. उत्पादन वाढले आणि निर्यात आहे तेवढीच राहिल्यास भावात घट होऊ शकते, असेही शहा यांनी सांगितले.