पुणे – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाला आज नवे वळण मिळाले आहे. सुशांतने आत्महत्यांचं केल्याचे एम्सने सीबीआयकडे सादर केलेल्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले असून यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुशांतचा खून झाला असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. इंडिया टुडे या वृत्तसंकेतस्थळाशी बोलताना एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यावेळी सुशांत मृत्यूप्रकरणाच्या तपासात मुंबई पोलीस कसूर करत असून त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारचा दबाव असल्याची टीका काही नेत्यांनी केली होती. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे, या गुन्ह्यात एका तरुण नेत्याचा सहभाग आहे असे गंभीर आरोपही करण्यात आले होते.
दरम्यान, एम्सच्या अहवालानंतर रोहित पवार यांनी एक ट्विट केलं असून याद्वारे त्यांनी, ‘महाराष्ट्राची व पोलिसांची बदनामी करणाऱ्या सर्वांनी तोंड न लपवता माफी मागावी’ अशी मागणी केली आहे.
ते लिहतात, “बिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी.”
बिहार निवडणुकीसाठी #SushantSinghRajput च्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर #AIIMS च्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी.#सत्यमेवजयते
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 3, 2020