आळंदी – आळंदीकरांसह भाविकांच्या सुरक्षेसाठी इंद्रायणी घाटावर पोलीस चौकी उभारली होती. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून ती कुलपबंद होती; मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ती सुरू केल्याने भाविक, आळंदीकरांच्या सुरक्षेसाठी बप्पाच पावला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.
आळंदी पोलीस ठाणे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयास जोडले गेल्यावर पोलिसांची संख्या वाढली. मात्र, शहरातील अवैध धंदे आणि भुरट्या चोरट्यांचा उपद्रव काही थांबला नाही. उलट त्यात वाढच झाली आहे. इंद्रायणी घाटावर दिवसा तसेच रात्रीच्या वेळी भुरट्या चोरांचा आणि बेकारांचा अड्डा सुरू झाला. रोज 200 ते 300 जण रात्रीच्या वेळी झोपत असतात. भांडणे मारामारी तसेच साध्या चोऱ्या रात्रीच्या वेळी नित्याच्याच झाल्या असल्याने त्या पोलीस ठाण्यात नोंदवण्याचे कष्टही नागरिक घेत नाहीत.
याचबरोबर पालिकेच्या वाहनतळावरही भांडणाचे प्रकार होता. या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी आळंदी पोलीस ठाण्याच्यावतीने इंद्रायणी घाटावर पोलीस चौकी उभारली आहे. म्हणतातना नव्याचे नऊ दिवस त्यानुसार एक दोन महिने या चौकीत पोलीस नियमित येत होते. मात्र, त्यानंतर चौकी कुलुपबंद अवस्थेत होती. मात्र, आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी ही चौकी सुरू केली आहे.
येथे सध्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र, रात्रीचा प्रश्न पुन्हा उद्भवू शकतो त्यामुळे येथे महिलेस पुरुष पोलिसाचीही नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.