पाटणा – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी आरोपींची बाजू घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणी बिहारमधील भाजपचे प्रवक्ते निखील आनंद यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात मुंबई पोलिसांबरोबर महाराष्ट्र सरकार देखील पूर्णपणे उघडे पडले आहे.
गेल्या 66 दिवसांपासून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस काय करत होते ? आता सर्वोच्च न्यायालयात ते पूर्णपणे उघडे पडले आहेत. आरोपींची उघड उघड बाजू घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या नेत्यांनी उघडपणे माफी मागायला पाहिजे, असे आनंद म्हणाले.
संजय राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरचे वक्तव्य दुर्दैवी आहे. सुरुवातीपासून महाराष्ट्र सरकार या प्रकरणाला राजकीय रंग देऊ पहात आहे, असेही ते म्हणाले.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिसांनी दाखल केलेली “एफआयआर’वैध असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी या प्रकरणी सीबीआय तपासाचे आदेश दिले होते. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची शिफारस करण्याचा बिहार सरकारला पूर्ण अधिकार असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते.